पुणे : राज्यात मराठा आरक्षणावरुन राजकीय वातावरण तापले आहे. यातच आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट घेतल्यानंतर, आता उदयनराजे आणि संभाजीराजे यांची पुण्यात मराठा आरक्षणप्रश्नी दुपारी पुण्यातील औंध-बाणेर रोडवर असलेल्या एका बंगल्यात भेट झाली. अर्धा तास झालेल्या या भेटीत दोघांच्यात मराठा आरक्षणाविषयी महत्वाची चर्चा झाली.
यानंतर दोघांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी, “मराठा आरक्षण मिळवून देणे ही ठाकरे सरकारची जबाबदारी आहे, त्यांनी लवकर निर्णय घेतला नाही, तर उद्रेक होईल,’ असा इशारा उदयनराजेंनी दिला आहे. तसेच, दोन्ही छत्रपती घराण्यांनी समाजाला नेहमीच दिशा दिली असून, दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे.
“संभाजीराजेंच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी कोणता निर्णय घ्यायचा, हा सर्वस्वी त्यांचा विषय आहे. पण एवढं नक्की आमचा मार्ग एकच आहे. आम्ही दोघे एकाच घराण्यातले आहोत. इथं दोन घराण्याचा संबंध येत नाही. त्यांनी जे विचार मांडले त्याचाशी मी सहमत आहे,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
यावेळी त्यांनी, ” जीआर काढून इतरांना आरक्षण दिलं, मग मराठा समाजाला सुद्धा आरक्षण द्या ना!,’ असं म्हणत, ‘मराठा समाज आणि ओबीसीत दुफळी निर्माण केली जात आहे,” असा आरोप देखील त्यांनी केला आहे. तसेच, “राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून, एकदाच काय ती चर्चा करावी. तुम्ही सभागृहात एक बोलता आणि बाहेर वेगळंच बोलता. लाईव्ह प्रक्षेपण करा. तुम्ही इथे निर्णय घ्या, मी केंद्रात पाहतो,’ अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली आहे.
यावेळी संभाजीराजेंनी परत एकदा त्यांच्या ५ मागण्यांची आठवण राज्य सरकारला करून दिली असून, १६ जूनला कोल्हापूरात मूक आंदोलन होणार आहे. ३६ जिल्ह्यांत काही आम्हाला जायचं नाही. मात्र, आता त्यावर राज्य-केंद्राने मार्ग काढावा. या माझ्या मागण्या मान्य कराव्यात,’ असं सांगत, ‘मराठा आरक्षणावर समाज बोलला, आम्ही बोललो. आता लोकप्रतिनिधींनी बोलायला हवं, विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करा,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
Read Also :
- मुख्यमंत्रिपद मागितले तर योग्य भूमिका घेणार; नाना पटोलेंचा स्पष्ट इशारा
- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे युद्धपातळीवर सुरु
- मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहण्याचा सगळ्यांना अधिकार आहे; अजितदादांचा पटोलेंना टोमणा
- ‘केंद्राकडे बोट दाखवून आघाडी सरकार आपली भूमिका टाळू शकत नाही, राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी’- शाहू छत्रपती
- नाना भाऊ कसे मुख्यमंत्री होणार? अजित पवारांचे सुचक विधान