मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मूक आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण आदींसोबत प्रमूख मागण्यांबाबत संभाजीराजे यांची चर्चा झाली. या बैठकीनंतर बोलताना त्यांनी सरकार मागण्यांबाबत सकारात्मक आहे, मात्र आंदोलन मागे घेणार नसल्याचे म्हटले आहे.
आंदोलन अद्याप स्थगित झालेलं नसून पुढील निर्णय 21 जून रोजी नाशिकमध्ये घेतला जाईल, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
कोल्हापूरमध्ये सुरु झालेलं मूक आंदोलन सुरुच राहणार आहे. हे आंदोलन 36 जिल्ह्यांमध्ये घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे. राज्य सरकारशी झालेल्या चर्चेत त्यांनी आंदोलन थांबवण्याबाबत विनंती केली. मात्र, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. सरकारशी चर्चा सुरु आहे. नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे ते म्हणाले.
मराठा समाजाने राज्य सरकारकडे केलेल्या मागण्या आणि त्या मागण्यांवर राज्य सरकारने दिलेलं आश्वासन याचा पाठपुरावा घेण्यासाठी एका समन्वय समितीची स्थापना करण्यास राज्य सरकारने सांगितलं आहे. त्यानुसार एका समितीची स्थापना केली जाईल. ही समिती प्रधान सचिव विकास खर्गे यांच्यासोबत दैनंदिन स्तरावर चर्चा करून पाठपुरावा करेल, असेही त्यांनी सांगितले.
संभाजीराजे यांनी माहिती दिली की, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार येत्या गुरुवारी पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. सरकारने सारथीसाठी लागेल तेवढा पैसा देण्याची तयारी दर्शवली आहे. मराठा आरक्षण आंदोलनातील 1 गुन्हा वगळता इतर गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं.
Read Also :
- ‘मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणी अटक झालेल्या सगळ्यांचे ‘गॉडफादर’ उद्धव ठाकरे?’
- एनआयए कडून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अटक, आजच सेशन कोर्टात हजर करणार
- एनआयए कडून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अटक, आजच सेशन कोर्टात हजर करणार
- अनिल देशमुखांना धक्का! महत्त्वाची कागदपत्रे हाती, ईडीने नागपूरमध्ये केली 3 जणांची गुप्त चौकशी