मुंबई : सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुरु असलेल्या वादात, आता राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी उडी घेतली असून, “औरंगजेबाला जसे स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, तसंच चंद्रकांत पाटील यांना स्वप्नात अजित पवारच दिसतात,” अशी टीका त्यांनी पाटील यांच्यावर केली आहे.
तसेच, “चंद्रकांत पाटलांचे मानसिक संतुलन बिघडले असून, पाण्याशिवाय मासे जसे तडफडतात, तशी राज्यातल्या भाजप नेत्यांची अवस्था झाली आहे. त्यांनी उगाचच सत्तेची स्वप्नं पाहू नयेत. आता राज्यात पुढचे १५ वर्षे तरी महाविकास आघाडीची सत्ता असेल,” असा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी, “तुम्ही सरकार कधी पडणार विचारत आहात, मी सांगतो की, असेच सगळे झोपेत असतील तेव्हा हे सरकार पडेल आणि कुणाला कळणारच नाही आघाडी सरकार कधी गेलं,” असा दावा केला होता. यावर अजित पवार यांनी, “ज्या दिवसापासून राज्यात आघाडी सरकार आलं आहे, तेव्हापासून भाजप नेत्यांना आपण सरकारमध्ये नाही, ही भावना सतत बोचत आहे, त्यांना असह्य होत आहे. कार्यकर्त्यांनी पक्षासोबत रहावं यासाठी ते काही बाही बोलत राहतात,’ असं प्रत्युत्तर दिलं.
दरम्यान, आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, “झोपेत असताना सरकार कसं आणायचं, हे अजितदादांना चांगलचं माहिती आहे. स्वतः शरद पवार झोपेत असताना त्यांनी राज्यात सरकार आणलं होतं, याचा त्यांना विसर पडला आहे का?, ज्यांच्या मांडीला मांडी चिकटवून तुम्ही, राज्यात ३ दिवसांचं का होईना; पण सरकार स्थापन केलं होतं. त्यांच्यावरच टीका करताना, जरा तरी विचार करा. अजितदादा सांभाळून बोला! कसं आहे, मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर तुम्हाला खूप महागात पडेल,” अशा शब्दांत अजित पवारांना इशारा दिला.
Read Also :
- गाढ झोपलेल्या ठाकरे सरकारला उठवण्यासाठी, ओबीसींना आंदोलन करावंच लागेल!
- ‘ओबीसी आरक्षणप्रश्नी आता केंद्रानेच हस्तक्षेप करावा!’
- अनिल परब यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची होणार चौकशी.
- केंद्राकडून अजित पवारांवर मोठी जबाबदारी!
- ‘अजितदादा सांभाळून बोला! मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर महागात पडेल!’