मुंबई : राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात पैश्यांची मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचा आरोप नाशिकमधील आरटीओतील निलंबित वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केला असून, त्यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह राज्यातील इतर ६ बड्या अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत.
दरम्यान, आता या तक्रारीची सखोल चौकशी करण्याकरता राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे हे आज नाशिकमध्ये, येणार असून, ते क्राईम ब्रँच युनिटकडून या प्रकरणाची सखोल माहिती घेणार असल्याची शक्यता आहे. तसेच, ते तक्रारदार पाटील यांच्याशी देखील संपर्क साधणार असल्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.
काय आहेत आरोप?
निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी, परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील या ६ वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात, नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी, तसेच इतर व्यवहारात आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी दाखल केलेल्या या तक्रारीत केला आहे. तसेच, आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने ३०० कोटी रुपयांचा बदलीचा मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी या तक्रारीत केला आहे.
अनिल परब यांनी फेटाळले आरोप…
दरम्यान, यानंतर तातडीने परिवहनमंत्री अनिल परब यांनी ट्विटरवरून ट्विट्सची मालिका करत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून, “मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून, उच्च न्यायालयामार्फत CBI चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे,” असा आरोप त्यांनी तक्रारदार निलंबित वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केला आहे.
तसेच, “विभागातील अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे. निलंबित मोटार वाहन निरीक्षक निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर पाच अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक येथे दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे. या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करीत असून, चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल,” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- केंद्राकडून अजित पवारांवर मोठी जबाबदारी!
- ‘अजितदादा सांभाळून बोला! मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर महागात पडेल!’
- ‘आत्तापर्यंत नेहरूंच्या पुण्याईवरच देश चालतोय!’
- ‘सरकारला फक्त अल्टिमेटम देऊ नका! सर्व मराठा संघटनांना एकत्र आणा’
- ‘समाज माध्यमांना संपवून लोकांना तुरुंगात डांबण, हा भाजपचा नवीन डाव’