दिल्ली : सध्या, राज्यातील महत्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत भेटीगाठी वाढल्या असून, दिल्लीतल्या राजकीय खलबतं आणि डावपेचांमुळे, राज्यातील राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. सर्व प्रथम काल फडणवीसांनी दिल्लीवारी करत अमित शहांची भेट घेतली, यांनतर आज शरद पवारांनी राजनाथ सिंग, पियुष गोयल आणि पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे आणि याची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती, अशी माहिती देखील राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. तसेच, पवार-फडणवीस यांच्या भेटीच्याही चर्चा सुरु होत्या, मात्र ही भेट एक अफवा होती असा खुलास देखील त्यांनी यावेळी केला आहे.
फडणवीसांनी दिल्लीवारी- अमित शहांशी या मुद्द्यांवर चर्चा…
या भेटीबद्दल खुलासा करताना, फडणवीसांनी सांगितले आहे की, “नवीन मंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही भेट होती. तसेच आणखी काही कामं होती,. राज्यातल्या कामांसाठी दिल्लीला जावं लागतंच,” असं म्हणत, “या भेटीचा कुठलाही राजकीय अर्थ लावण्याचं काही कारण नाही,” असं त्यांनी सांगितलं.
भेटीमागे दडलंय काय?
सहकार मंत्रालय स्थापन झाल्यापासून आणि अमित शहा देशाचे पहिले सहकार मंत्री झाल्यानंतर, या दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या तब्बल २ तासांच्या चर्चेत, राज्यातील सहकार क्षेत्रातील गैरव्यवहारावर गंभीर आणि मुद्देसूद चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी, राज्यातील ४३ साखर कारखान्यांची ईडीची चौकशी व्हावी, असं पत्र अमित शहा यांना लिहिलं होतं. त्यानंतर सहकार मंत्रालय हे अमित शहा यांच्याकडे आलं आणि आता या दोन नेत्यांची भेट; त्यामुळे सहकार क्षेत्रातील गैरव्यवहाराची चौकशी आता अधिक सखोल होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच राज्याच्या राजकारणावर आणि आगमी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीवर, तसेच मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरही चर्चा झाल्याची शक्यता आहे.
शरद पवारांनी घेतली राजनाथ सिंग, पियुष गोयल यांची भेट
मागील २ दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीत आहेत. यावेळी पीयूष गोयल यांनी स्वतः शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ही एक सदिच्छा भेट होती. पियुष गोयल यांची, राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सहकार्याबाबत आणि शिष्टाचाराचा भाग म्हणून त्यांनी ही भेट घेतल्याची माहिती नवाब मलीक यांनी दिली.
यांनतर, देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात एक बैठक झाली. या बैठकीला त्यांनी उपस्थिती दर्शवली. या बैठकीला पवार यांच्यासोबत माजी संरक्षणमंत्री काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए. के. अँटोनी, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि भूदल प्रमुख जनरल मनोज नरवणे उपस्थित होते.
भेटीमागे दडलंय काय?
यावेळी, “सीमेवर ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याबाबत सरकारकडून माहिती दिली गेली. याचबरोबर अशी परिस्थिती हातळण्यासंदर्भात काही महत्वपूर्ण चर्चा देखील झाली. पवार हे माजी संरक्षणमंत्री असल्याने त्यांच्याशी बोलणे महत्वाचे होते. त्यांना लडाखमधील चीनच्या हालचाली आणि भारताची स्थिती याबद्दल माहिती दिली गेली,” असं मलिक यांनी सांगितलं.
Nationalist Congress Party leader Sharad Pawar calls on Prime Minister Narendra Modi in Delhi pic.twitter.com/NuDCpGQSn8
— ANI (@ANI) July 17, 2021
पंतप्रधान मोदींसोबत तब्बल तासभर चर्चा, त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण; नवाब मलिकांनी केला खुलासा
कालपासून माध्यमांमधून आदरणीय खा. शरद पवार साहेब राष्ट्रपती होणार असल्याच्या बातम्या येत आहेत,त्या पार्श्वभूमीवर आज ना. @nawabmalikncp यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. या बातम्या निराधार आहेत, पेरण्यात आल्या आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही, असे मलिक यांनी स्पष्ट केले.@PawarSpeaks pic.twitter.com/EaaHvCw3O0
— NCP (@NCPspeaks) July 15, 2021
पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीबद्दल माहिती देण्यासाठी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी….
- या भेटीत चर्चिल्या जाणाऱ्या मुद्द्यांवर आधी फोनवर चर्चा केली होती. मात्र, प्रत्यक्ष बसून चर्चा होण्याची अपेक्षा होती. आज ती भेट झाली. त्यामुळे, ही भेट पूर्वनियोजित होती.
- सहकारी बँक अधिनियम बदलण्यात येत आहेत, त्यावर चर्चा झाली.
- आरबीआयला एवढे अधिकार कसे? नव्या नियमानुसार कोणीही शेअर होल्डर शेअर विक्री करू शकतात. या नियमामुळे अनेक मोठे उद्योजक यात येतील आणि सहकार मोडीत निघेल. या बैठकीत ही लेखी मागणीही होती. रिझर्व्ह बँकेला जास्त अधिकार देण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या सहकार क्षेत्रातील नियमांमुळे, स्वायत्ततेचा अधिकार धोक्यात आला आहे, याबद्दलच ही भेट होती.
- महामारीवर मात करण्यासाठी राष्ट्रीय धोरण बनवावे, याविषयी देखील बैठकीत चर्चा झाली.
- लसीकरण प्रक्रियेतल्या असमतोलावरही पवार यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली.
- पंतप्रधान मोदी-शरद पवार भेट होणार असल्याचं काँग्रेस नेत्यांना माहिती होतं.
असे सांगितले आहे. तसेच, “भाजप-राष्ट्रवादी काॅंग्रेस हे एकाच नदीचे दोन किनारे आहेत. ते एकमेकांना कधीच भेटू शकत नाहीत. भाजपचा राष्ट्रवाद आणि आमचा राष्ट्रवाद यात फरक आहे. भाजपशी राजकीय सख्य असण्याचे कारण नाही, मात्र राजकारणात वैयक्तिक मैत्री असू शकते, याचा अर्थ एकत्र येणार असा नसतो,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Through a letter, I have drawn the kind attention of our Hon’ble PM towards issues and conflicts in the wake of certain developments in the co-operative banking sector. Although the objects and reasons for amending the Act can be lauded, pic.twitter.com/DCVpJs1zAi
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 17, 2021
या भेटीवर भाजप-शिवसेना-काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया…सारं काही आलेबल?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील – “अधिवेशनापूर्वी मोठे नेते एकत्र येऊन चर्चा करतात. या भेटीत भारत-चीन सीमाप्रश्न, कृषी कायदे आणि नव्या सहकार मंत्रालयाबाबत चर्चा झाली असावी. नवीन सहकार मंत्रालय व कायद्याची माहिती पवार यांनी घेतली असावी.
कृषी कायदे आणि त्या विरोधात सुरू असलेले आंदोलन, ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि त्यासंदर्भातील इम्पारिकल डाटा यांसंदर्भात चर्चा झाली असावी, असं म्हणत आजची भेट साधारण भेट आहे, पण तरीही काही घडले असेल, तर मला त्याबाबतची माहिती नाही,” अशी वेगळी टिपण्णी त्यांनी केली आहे.
तसेच, सध्या राज्यात राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता कमी आहे. कारण, सत्तेतील तिन्ही पक्षांना एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही, ते एकत्र राहिले नाही तर मात्र त्यांची स्थिती फार वाईट होईल आणि याचे परिणाम तिन्ही पक्षांना माहिती आहेत, असे देखील त्यांनी नमूद केले आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत- “या भेटीचे राजकीय अर्थ का काढले जात आहेत? शरद पवार हे देशातील प्रमुख नेते, ते कृषी आणि सहकार क्षेत्रातील जाणकार, त्यामुळे त्यांना वाटेल तेव्हा ते पंतप्रधानांना भेटू शकतात. त्यामुळे, यात काही राजकारण आहे, असं वाटत नाही, ते जेव्हा जेव्हा पंतप्रधानांना भेटतात, तेव्हा तुम्ही त्यात राजकारण का काढता?” असं म्हणत त्यांनी माध्यमांवर निशाणा साधला आहे.
अनेक सवाल…अनेक शक्यता…
- केंद्राकडून सहकार खात्याची निर्मिती करून त्याची जबाबदारी अमित शहांकडे सोपवण्यात आल्याने, राज्यात सहकार क्षेत्रात दबदबा असलेल्या राष्ट्रवादीचे धाबे दणाणले आहेत, याबद्दल चर्चा झाली असण्याची शक्यता.
- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने, शेतकरी आंदोलन आणि लडाखमधील सीमावर्ती भागातील चीनच्या हालचाली, देशातील करोनाची परिस्थिती, फ्रान्समध्ये नव्याने सुरू झालेली राफेल कराराची चौकशी, देशातील लसीकरणाची अवस्था या मुद्द्यांवर अधिवेशनात हलके घेण्याबद्दल चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
- भाजपाकडून राष्ट्रवादीला सोबत घेऊन २०१९ मध्ये राज्यात सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला होता, त्यानंतर सातत्याने भाजपाकडून ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु, या पार्श्वभूमीवर ही भेट असू शकते.
- शिवसेनेला बाजूला करून २०२४ ची लोकसभा निवडणूक, तसेच विधानसभा निवडणूक हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात एकत्र लढणार का? या भेटीने राज्यातील राजकीय समीकरण बदलणार का?
- काँग्रेसमध्ये अस्वस्थ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांची स्वबळाचीच भाषा. पवार यावर नाराज. या घडामोडींचा पवार-मोदी भेटीशी संबंध आहे का?
- भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार?
- पुढील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस वगळता इतर पक्षांचे नेतृत्व पवार करणार असल्याची चर्चा, तसेच ते राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत असल्याचीही चर्चा, यावर देखील काही बातचीत झाली असण्याची धूसर शक्यता.
- ईडीच्या सुरु असलेल्या चौकश्यांवर चर्चा?
हे सर्व तर्क असून त्याला अजून कोणत्याही पक्षाने किंवा पक्षातील नेत्यांनी अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.
Read Also :
- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजप युती? फडणवीसांचे सूचक विधान
- शिरुरचे आजी-माजी खासदार आमने-सामने; रस्ता उद्घाटनाचे श्रेय लाटण्यासाठी आक्रमक!
- ईडी, सीबीआयच्या रडारवर कोण? का म्हणाले चंद्रकांत पाटील, रात्रीत कुणालाही अटक होऊ शकते…वाचा सविस्तर
- ‘मिस्टर इंडिया’ झालेल्या झोटिंग समितीच्या अहवालावर, अजित पवारांचा मोठा खुलासा
- पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध जितेंद्र आव्हाड संघर्ष, महाविकास आघडीवर होणार याचा परिणाम?