नवी दिल्ली : हिंदू असेल तर तो देशभक्त असायलाच हवा. देशभक्त असणे हे हिंदूंच्या नसानसात भिनलेले असते. हिंदू भारतद्रोही असूच शकत नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. ‘सेंटर फॉर पॉलसी स्टडीज’ या सामाजिक संशोधन केंद्रातर्फे जे. के. बजाज आणि एम. डी. श्रीनिवास या लेखकांच्या ‘मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रियॉट- बॅकग्राउंड ऑफ गांधीजीज हिंद स्वराज’ या पुस्तकाचे प्रकाशन मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.
भागवत म्हणाले की, वेगळे असल्याचा अर्थ असा नाही, की आपण एका समाजाचे अथवा एक धरतीचे पुत्र बनून राहू शकत नाही. एवढेच नाही, तर पुस्तकाचे नाव आणि माझ्या हस्ते त्याचे विमोचन, याचा असाही अर्थ काढला जाऊ शकतो, की हा गांधीजींना आपल्या सोयीनुसार परिभाषित करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, महापुरुषांना कुणीही आपल्या सोयीनुसार परिभाषित करू शकत नाही.
माझी देशभक्ती माझ्या धर्मातून येते, असे महात्मा गांधी म्हणत असत. स्वधर्म समजला तरच गांधीजींच्या स्वराज्याचा अर्थ समजेल. की माझी देशभक्ती माझ्या धर्मातून येते. मी माझा धर्म समजूनच एक चांगला देशभक्त बनेन आणि लोकांनाही असेच करायला सांगेन. एवढेच नाही, तर स्वराज्य समजून घ्यायचे असेल, तर स्वधर्माला समजून घ्यावे लागेल, असेही गांधीजी म्हणाले होते, असे देखील ते यावेळी म्हणाले.
निर्भय असल्याशिवाय अहिंसा आचरणात येऊ शकत नाही. हिंदूंनी हिंसेने प्रतिकार करू नये. सर्व हिंदू नष्ट झाले तरी मी राहीन असे गांधीजी म्हणत. त्यातून त्यांची हिंदू धर्मावरील निष्ठा दिसते, असे भागवत म्हणाले.