मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यांमध्ये गेल्या काही दिवसांत जुंपल्याचे दिसत आहे. पहाटेचे सरकार स्थापन्यापासून ते महाविकास आघाडी सरकार पडण्यापर्यंत अनेक मुद्यांवरून दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. चंद्रकांत पाटील यांनी पहाटेच्या सरकार स्थापनेवरून देखील अजित पवारांवर निशाणा साधला होता. यावर आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे.
अजित पवारांनी 54 आमदारांच्या सहीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक असा सवाल चंद्रकांत पाटलांनी करणे हे त्यांच्या मनातील अस्वस्थतेचे लक्षण आहे. चंद्रकांत पाटलांनी याप्रकरणी ‘आ बैल मुझे मार’ असेच केले आहे. अजित दादा मोठय़ा पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरीत असताना त्या काळोख्या खोलीत ‘टॉर्च’चा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी अजित पवारांबरोबर भाजपचे कोण कोण लोक होते? याचाही खुलासा आता व्हायला हवा, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.
भाजपचे नेते आजही दीड-दोन वर्षांपूर्वीच्या ‘अजित-देवेंद्र’ यांच्या शपथविधीच्या पहाट सोहोळय़ातच गुंतून पडले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एक चांगले केले. त्यांनी आता सांगून टाकले, अजित पवारांबरोबर घाईघाईत सरकार बनवले ही आपली चूकच झाली. असे केल्याने आपल्या प्रतिमेस तडा गेल्याचेही त्यांनी मान्य केल्याने त्यांच्यापुरता या प्रकरणावर पडदा पडला, पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना मात्र त्यांचे मन त्या पहाटेच्या गुंत्यातून बाहेर पडू देत नाही. राजकारणातील गुंत्यात इतके अडकून पडणे बरे नसते, पण पाटलांना हे सांगायचे कोणी, असा सणसणीत टोला शिवसेनेने चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.
अजित पवार यांनी पवारांच्या डॉवरमधून पत्र चोरले हा आरोप निव्वळ भंपक आहे. 54 आमदारांच्या सहीचे पत्र अजित पवारांना चोरण्याची आवश्यकता नाही. जेव्हा पहाटेचे हे उद्योग सुरू होते तेव्हा अजित पवार हे राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवडले गेलेच होते व आमदारांच्या सहीचे पत्र त्यांच्याकडे असणारच. ते चोरले किंवा बनावट पद्धतीने मिळवले असे सांगणे हा राजकीय बालिशपणा आहे. किरकोळ चोऱ्यामाऱ्या करून राजकीय गुजराण करणाऱयातले अजित पवार नाहीत, असे म्हणत शिवसेनेने अग्रलेखातून अजित पवारांची बाजू उचलून धरली आहे.
भाजपच्या दादांनी राष्ट्रवादीच्या दादांवर ‘लेटर बॉम्ब’ टाकला खरा, पण तो चंद्रकांतदादांच्या हातातच फुटला. पुन्हा दादा एकीकडे अजित पवारांवर पत्र चोरीचा आरोप करतात, तर दुसरीकडे शिवसेनेने ‘दगा’ दिला म्हणून शिवसेनेला धडा वगैरे शिकविण्याचा प्रयत्न भाजपने केला, असेही सांगतात. बरं, हा प्रयत्न फसला असेही मान्य करतात. मुळात राजकारणात अशा असलेल्या-नसलेल्या गोष्टी कितीही उगाळल्या तरी त्यातून मनस्तापाशिवाय हाती काहीच लागत नाही. चंद्रकांतदादांसारख्या ज्येष्ठ नेत्याला हे सांगण्याची तशी गरज नाही. सत्ता गेल्याचे शल्य ठीक आहे, पण दादा अशी किती तगमग करून घेणार आहात?, अशी खोचक टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
Read Also :
- ‘महाराष्ट्रात आपलं सरकार आहे, काय दिवे लावले या कर्मदरिद्री सरकारने?’
- पंतप्रधानांची मोफत लसीकरणाची घोषणा; राहुल गांधींनी विचारला ‘हा’ साधा प्रश्न
- ‘त्या’ निर्णयासाठी देवेंद्र फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
- ‘शेवटी कोरोना लस फुकट देण्याची जबाबदारी बापानेच घेतली’
- पुणे : रासायनिक कंपनीतल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर