मुंबई : अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम व त्यामागचा व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक पद्धतीने व्हावा. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरे! राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळय़ाचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ही मागणी करण्यात आली आहे.
राममंदिरासाठी जमीन हस्तांतरणात मोठा भ्रष्टाराच झाल्याचा आरोप केला जात आहे. समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी आमदार तेजनारायण पांडे राममंदिरासाठी 2 कोटी रूपयांनी खरेदी केलेली जमीन काही मिनिटातच 18.5 कोटी रूपयांमध्ये पुन्हा खरेदी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. यानंतर आपचे खासदार संजय सिंह यांनीही याच प्रकारचा आरोप केला. यावर आता सामनातून भाष्य करण्यात आले आहे.
अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर व्हावे ही तर जगभरातील तमाम हिंदूंचीच इच्छा आहे. त्या राममंदिरासाठी हिंदूंना मोठा लढा त्यांच्याच हिंदुस्थानात द्यावा लागला. अयोध्येच्या भूमीवर साधू, संत, करसेवकांनी रक्त सांडले. शरयू नदी हिंदूंच्या रक्ताने लाल झाली. बाबरीचे घुमट शिवसैनिकांनी तोडताच मुंबईसह देशातील अनेक भागांत दंगली उसळल्या. त्यातही असंख्य हिंदूंना प्राण गमवावे लागले. गुजरातमधील साबरमती एक्सप्रेसवर हल्ला झाला. ते पुढे ‘गोध्राकांड’ म्हणून इतिहासात नोंदले गेले. त्या गोध्राकांडानंतरही अयोध्येहून परतणाऱया असंख्य रामसेवकांचे मृत्यू झाले. मुंबईत 93 सालात भीषण बॉम्बस्फोट मालिका घडवून धर्मांध पाकडय़ांनी शेकडो निरपराधांचे प्राण घेतले. हा अयोध्या लढय़ाचाच बदला होता. अशा असंख्य हिंदूंच्या त्यागातून, बलिदानातून, प्रदीर्घ कायदेशीर संघर्षातून सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहत असतानाच एक नवीनच घोटाळा बाहेर आला असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.
‘रामजन्मभूमी स्थानावर मंदिर निर्माण करावे यासाठी रामलल्लांच्या नावाने अयोध्येत बँक खाते उघडण्यात आले असून त्या खात्यावर जगभरातील कोटय़वधी श्रद्धाळूंनी शेकडो कोटी जमा केले आहेत. अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री योगी महाराजांच्या हस्ते संपन्न होताच विश्व हिंदू परिषदेचे चार हजारांवर स्वयंसेवक देशभरात घरोघर फिरून सामान्यांकडून राममंदिर निधीसाठी पावत्या फाडत होते. त्यातूनही कोटय़वधी रुपये जमा झाले. शिवसेनेनेही एक कोटीचा निधी मंदिर कार्यासाठी दिलाच आहे. अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम व त्यामागचा व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक पद्धतीने व्हावा. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले.’
राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे असल्याचे देखील शिवसेनेने म्हटले आहे.
Read Also :
- ‘दोन्ही राजे एकत्र आल्याचे स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं’
- ‘मराठा समाजासोबतच दोन्ही राजेंनी ओबीसींच्या हक्कासाठी सुद्धा पाठिंबा द्यावा’
- केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांच्या चर्चा, प्रीतम मुंडेंची मंत्रीपदी वर्णी लागणार ?
- ‘काँग्रेस हाच भाजपाला पर्याय, गावखेड्यात पक्षाचा विचार पोहचवा’; पटोलेंचा कार्यकर्त्यांना आदेश
- ‘महापौरांना काही बोलायची भीती वाटते, त्या आमचा बाप काढतील’