मुंबई : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. काही कंपन्यांनी हे नवीन धोरण लागू करण्याची तयारी दर्शवली आहे, तर काहींनी न्यायालयात धाव घेतली आहे. गेल्या काही दिवसात केंद्र सरकार आणि मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरमध्ये देखील संघर्ष पाहायला मिळाला. ट्विटरने देशातील काही प्रमुख व्यक्तीच्या अकाउंट समोरील ब्लू टिक हटवल्याने टीकेची झोड उठली होती. आता या सर्व घडामोडींवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे.
कालपर्यंत हे ट्विटर म्हणजे भाजप किंवा मोदी सरकारसाठी त्यांच्या राजकीय लढय़ाचा किंवा प्रचाराचा आत्मा होता. आता भाजपला ट्विटरचे ओझे झाले असून हे ओझे कायमचे फेकून द्यावे या निर्णयाप्रत मोदींचे सरकार आले आहे, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.
समाजमाध्यमांवर गेल्या काही वर्षांपासून चिखलफेकीचा, बदनामी मोहिमांचा कार्यक्रम सुरू आहे. त्याची निर्मिती, दिग्दर्शन, नेपथ्य, कथा-पटकथा सर्वकाही भाजपचेच होते. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ऍप या माध्यमांचा मनसोक्त वापर करण्याची रीत इतर राजकीय पक्षांना माहीत नव्हती तेव्हा या कार्यात (2014) भाजपने नैपुण्य प्राप्त केले होते. त्या काळातील प्रचारात भाजपच्या फौजा जमिनीवर कमी, पण सायबर क्षेत्रांतच जास्त खणखणाट करीत होत्या. हिंदुस्थानातील ट्विटरसह सर्वच समाजमाध्यमांचे जणू आपणच मालक आहोत व सायबर फौजांच्या माध्यमांतून आपण कोणतेही युद्ध, निवडणूक जिंकू शकतो, विरोधकांना उद्ध्वस्त करू शकतो, असा एकंदरीत तोरा होता, असे म्हणत शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांना ज्या शब्दांत ट्विटर किंवा फेसबुकवर शिवराळ शब्द वापरले गेले ते कोणत्या नियमात बसले? मनमोहन सिंगांसारख्या ज्येष्ठ नेत्यास काय काय विशेषणे लावली? उद्धव ठाकरे यांच्यापासून ममता बॅनर्जी, शरद पवार, प्रियांका गांधी, मुलायम सिंग यादव अशा राजकारण व समाजकारणात हयात घालविलेल्या नेत्यांच्या विरोधात या ‘ट्विटर’ वगैरेंचा वापर करून बदनामी मोहिमा राबविल्या गेल्या. जोपर्यंत हे हल्ले एकतर्फी पद्धतीने सुरू होते तोपर्यंत भाजपवाल्यांना गुदगुल्या होत होत्या, पण आता त्यांच्या सायबर फौजांसमोर विरोधकांचे त्याच ताकदीचे सैन्य उभे करून हल्ले सुरू झाले तेव्हा भाजपच्या तंबूत घबराट झाली, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
‘ट्विटर’चे राजकीय महत्त्व भाजपसाठी संपले आहे. कारण भाजपविरोधकांनी या माध्यमांचे कोपरे बळकावून भाजपच्या खोटय़ानाटय़ा प्रचारास उत्तर देणे सुरू केले. ‘अरे ला कारे’ जोरात सुरू आहे व अनेक ठिकाणी ‘ट्विटर’च्या रणमैदानातून भाजपला, त्यांच्या सरकारला माघार घ्यावी लागत आहे आणि त्यांच्या ‘ट्विटर’ सेनेचीही दाणादाण उडत आहे. ‘ट्विटर’चा अतिरेक व इतर काही गोष्टी आहेतच, पण याच अतिरेकाचा वापर करून भाजप व मोदी 2014 साली विजयी झाले होते. हे कोणत्या नियमात बसत होते?, असा सवाल सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.
Read Also :
- ‘केंद्र सरकार ‘ब्लू टिक’साठी भांडतंय, लसीसाठी आत्मनिर्भर बना’
- ‘भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला, विरोध करणारे नतदृष्ट कोण?’
- ‘महाराष्ट्राला दीड कोटी लस देणार असल्याने केंद्र सरकारने पुनावालांना तंबी दिली’
- ‘नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोललं की लोकं चंपा म्हणतात’
- ‘अजितदादांनी शरद पवारांच्या ड्राव्हरमधून 54 आमदारांची यादी चोरणे हे कोणत्या नैतिकतेत बसते?’