मुंबई : मुंबईत शाखाप्रमुखांपासून इमारतीप्रमुखासोबत आमचं घट्ट नातं आहे. त्यामुळे मुंबईत कुणीही कसेही आपले शड्डू ठोकले तरी त्याच्याशी आमचं काहीही घेणंदेणं नाही. बिहारला यश मिळालं म्हणून मुंबईत यश मिळेल असं नाही, असा टोला मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला लगावला आहे. मुंबईत काल भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपवून भाजपने निवडणुकीचं बिगूल फुंकलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचं सांगून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. या टीकेला किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे. आम्ही मुंबईला कधीच राजकारणाचा अड्डा बनवला नाही. मुंबई आशिया खंडातील एक नंबर शहर आहे.
या मुंबईच्या सुख-दुःखात शिवसेना कायम उभी राहिलेली आहे. शिवसेनेची नाळ महाराष्ट्र आणि मुंबईच्या जनतेशी अधिक दृढ झालेली आहे. हे संबंध कायम कसे जपून राहतील याकडे आमचं लक्ष असतं. आमचा लोकप्रतिनिधी ज्यादिवशी निवडून येतो, त्यादिवसापासून तो काम करत असतो. त्यामुळे आम्हाला त्याची फारशी काळजी नाही, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
भाजपने रणशिंग फुकलंय. यातून मुंबईला रणसंग्राम करण्याचा त्यांचा उद्देश हा स्पष्ट होतोय. या रणसंग्राममध्ये आमच्या मुंबईकरांना जराही त्रास झाला तर आम्ही कदापी सहन करणार नाही. आम्ही कधीच रणशिंग किंवा रणसंग्राम मानत नाही, असा घणाघात महापौरांनी केला. मुंबई हे आमचं कुटुंब आहे. आम्ही कुटुंबाप्रमाणे वागत आलो आहोत. आमच्या कुटुंबात भाजप समरस झाली होती. पण आता त्यांना वेगळे स्वप्न पडत आहेत. ठिक आहे, स्वप्न बघण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. पण स्वप्न भंग करायचं का ते जनता ठरवेल, असा चिमटा किशोरी पेडणेकर यांनी काढला.
Read Also ;
फडणवीसांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही: जयंत पाटील
भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
शिवसेनेच्या वचननाम्यातील ३० टक्के विज दर कपातीचे आश्वासन कागदावरच
“खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केले “
‘लातों के भूत बातों से नहीं मानते” म्हणत मनसेचा आंदोलनाचा इशारा