मुंबई : देशात नरेंद्र मोदी आणि भाजपची सत्ता येऊन आज ७ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस काँग्रेसकडून ‘काळा दिवस’ म्हणून साजरा केला जात असून, मोदी सरकारच्या कारभाराविरोधात राज्यभर काँग्रेसची निदर्शने सुरु आहेत. तसेच, पंतप्रधान मोदींनी नैतिक जाबाबदारी स्वीकारून राजीनामा दयावा, अशी मागणी देखील काँग्रेसकडून केली जात आहे.
“मोदींनी २०१४ च्या निवडणुकीत भारताच्या जनतेला खोटी स्वप्ने दाखवून सत्ता काबीज केली; पण गेल्या ७ वर्षांत मोदी सरकार हे सर्वच पातळ्यांवर फोल ठरले आहे. त्यांना महामारीची देशातील परिस्थिती हाताळता आली नाही. महामारीच्या पहिल्या लाटेत ‘नमस्ते ट्रम्प’च्या आयोजनात हे सरकार व्यस्त राहिले आणि जेव्हा परिस्थिती अंगलटी आली, तेव्हा सगळे खापर तबलीगीच्या नावावर फोडून, महामारीला धार्मिक रंग दिला,” अशी टीका महाराष्ट्र काँग्रेकडून मोदी सरकारवर करण्यात आली आहे.
“दुसऱ्या लाटेतदेखील बाधित रुग्ण आणि मृत्यूदर देशात वाढत असताना, मोदी सरकार पाच राज्यांच्या विधानसभा प्रचारात दंग होते. मोदींनी आपल्या मनमर्जी कारभाराने देशातल्या १३० कोटी जनतेला महामारीच्या खाईत लोटण्याचे काम केले आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार आता राहिलेला नसून, पंतप्रधान मोदींनी त्वरित नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा,” अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
आज काँग्रेसने जिल्हा, तालुका स्तरावर काळ्या फिती लावून निदर्शने केली, तसेच मोदी सरकारचा निषेध केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, “मोदी सरकारच्या काळात महागाई प्रचंड वाढल्यामुळे लोकांना जगणे जड झाले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेल या रोजच्या जगण्यातला गोष्टी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. बेरोजगारी वाढली आहे, अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे, महामारीत तर मोदी सरकारच्या बेजबाबदारपणामुळे लाखो लोक ऑक्सीजन, औषधांअभावी मरण पावले आहेत,” असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर तोफ डागली.
“जानेवारीमधेच सरकारने लसींचे नियोजन केले असते, तर आज लोकांना लसी मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागल्या नसत्या, पण त्यांनी आधी देशातल्या जनतेचा विचार न करता, पाकिस्तानसारख्या देशाला मोफत लस वाटली. देशातील जनतेला वाऱ्यावर सोडले. तिकडे ६ महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतोय; पण मोदींना त्यांची फिकीर नाही. त्यांनी देशातल्या शेतकरी, कामगार, कष्टकरी जनतेला देशोधडीला लावले. या सरकारच्या काळात देश अधोगतीकडे जात आहे आणि त्यासाठी काँग्रेसने आजचा दिवस ‘काळा दिवस’ पाळून याचा निषेध केला आहे,” अशी भूमिका त्यांनी काँग्रेसकडून मांडली आहे.
आज राज्यातल्या प्रत्येक विभागात, काँग्रेसच्या वरिष्ठ नेते व मंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन, मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल केली. पुणे येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नाशिकमध्ये विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, औरंगाबाद येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नागपूरमध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत, अमरावती येथे मंत्री विजय वडेट्टीवार, लातूरमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, कोल्हापूरमध्ये गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या काळ्या कारभाराची पोलखोल केली.
Read Also :
- ‘औरंगजेबाला स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, चंद्रकांतदादांना अजित पवार दिसतात’
- गाढ झोपलेल्या ठाकरे सरकारला उठवण्यासाठी, ओबीसींना आंदोलन करावंच लागेल!
- ‘ओबीसी आरक्षणप्रश्नी आता केंद्रानेच हस्तक्षेप करावा!‘
- अनिल परब यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची होणार चौकशी.
- केंद्राकडून अजित पवारांवर मोठी जबाबदारी!