प्रतिनिधी / ओंकार गोरे
पुणे : मागील काही दिवसांपूर्वी हिंगोलीचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर पुण्यामधल्या जहांगीर रुग्णालयामध्ये उपचार चालू होते. खासदार राजीव सातव यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांना डाँक्टरांकडून डिस्चार्ज सुद्धा मिळाला होता. मात्र त्यांना झालेल्या न्युमोनियाचा संसर्ग कायम राहीला. त्यामुळे राजीव सातव यांची प्रकृती सुधारते आहे असे वाटत असतानाच ती पुन्हा खालावली.
पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये भरती असलेले कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती अधिकच खालावल्याने अखेर आज (रविवारी) त्यांची प्राणज्योत मावळली.
सातव यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती. 22 तारखेला त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 23 एप्रिलपासून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची इच्छाशक्ती चांगली आहे, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
कोण आहेत राजीव सातव?
46 वर्षीय राजीव सातव हे सध्या कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्याकडे सध्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं गुजरात प्रभारी पद होतं. तसंच काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे ते निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार आणि राज्यसभेच्या खासदार होत्या.
राजीव सातव यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी लाटेतही विजय मिळवण्याची कामगिरी केली होती. त्यांनी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पराभूत केलं होतं. राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. पुढे 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान सातव यांच्यावर गुजरात प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्या निवडणुकीत काँग्रेसने चांगलं यश मिळवलं.
पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली होती. कॉंग्रेस आणि गांधी घराण्याशी असलेल्या निष्ठेमुळे त्यांच्यावर गुजरातच्या कॉंग्रेस प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. युथ कॉंग्रेसचे अध्यक्षपद देखील त्यांच्याकडे होते.
जिथे जन्म तिथेच मृत्यू.!
राजीव सातव यांचा जन्म पुणे शहरात झाला. त्यांचे पूर्ण नाव राजीव शंकरराव सातव असून त्यांचा जन्म 21 सप्टेंबर 1974 रोजी झाला. त्यांचे पूर्ण शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आणि आय.एल.एस. विधी महाविद्यालय पूर्ण झालं. सातव यांना आज 46 वर्ष पूर्ण झाली. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षातील राजकारणी आहेत. सातव २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या हिंगोली मतदारसंघातून निवडून गेले. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर ज्या शहरात त्यांनी जन्म घेतला त्याच मायभूमीत त्यांचा अंत झाला.
चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार
हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
राज्यसभेवर वर्णी
राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली होती.
भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला
काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते.
- राज्याने गमावला अभ्यासू नेता, काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन
- “नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात मृतदेहाचा रोजच्यारोज पडतोय ढिग” नाना पटोले
- वीज कापणार नाही, ट्रान्सफॉर्मरही बसवणार नाही, या सरकारला शेतकऱ्यांच्या फक्त पुळका- डॉ. अनिल बोंडे
- राज्यात कपाळकरंटे आणि पांढऱ्या पायाचे सरकार आले आणि आमचे…सदाभाऊ खोतांची टीका
- दोषींवर रितसर कारवाई करा; अण्णा बनसोडे व विलास लांडेच्या दोस्तीला अजित पवारांचा छेद