मुंबई : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर, मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असून, आज औरंगाबाद इथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका अजून मुद्देसूद आणि स्पष्टपणे मांडली.
“आता मराठा समाजाला त्यांचा न्याय मिळवून देण्याची योग्य वेळ आली आहे. बाकी बहुजन समाजाताली लोकांना जो न्याय मिळाला तोच मराठा समाजातील लोकांनाही मिळावा अशी आमची भूमिका आहे. तसेच, मराठा समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी माझा हा दौरा आहे. तो कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही. याबाबतीत मी मुख्यमंत्री, फडणवीस, शरद पवार या सगळ्या नेत्यांची भेट घेणार आहे. उद्या मी शरद पवार यांची भेट घेऊन, त्यांच्यासोबत मराठा आरक्षणाबाबत चर्चा करणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
तसेच, “जे राज्य सरकार जे करू शकतं ते त्यांनी करावं आणि केंद्राला जे शक्य आहे ते त्यांनी करावं, मात्र काहीही करून मराठा समाजाच्या हितासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा,” असं आवाहन त्यांनी केलं आहे. “सरकारकडे ५८ मोर्चे काढून हा विषय आधीच पोहचवला गेला आहे, त्यामुळे सरकारला सर्व गोष्टींची माहिती आहे. आंदोलन व्हावं की नाही, ते करावं की नाही हा नंतरचा प्रश्न आहे मात्र, शांततामय मार्गाने देखील प्रश्नाला हात घालून सरकार मराठा समाजाची दखल घेणार नसेल तर मात्र रस्त्यावर उतरुन आंदोलन करावंच लागेल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी त्यांनी राजकारण्यांना, “मराठा समाजाला राजकीय रंग चढवू नका, आत्ता राज्यकर्त्यांनी भूमिका मांडण्याची वेळ आहे. राज्यातल्या सगळ्या नेत्यांनी केवळ समाजासाठी योग्य ते काय करता येईल याचा विचार राजकारण सोडून करावा,” असे सांगितले तसेच, “दोन्ही सरकारांच्या हातात अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे सगळ्यांनी आपआपली जबाबदारी, त्यात माझ्यासकट खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते सगळे आले, ती ओळखून एकत्र काम केले पाहिजॆ. माझ्यासकट जो काही टक्का श्रीमंत वर्ग आहे, त्यांना तुम्ही मदत देऊ नका, जो उरलेला ३०% गरीब मराठा समाज आहे, त्यासाठी मात्र मदत करा,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
दरम्यान, या दौऱ्याअंती संभाजीराजे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर या दौऱ्याचा संपूर्ण लेखाजोखा आणि भूमिका मांडणार आहेत. तसेच, २८ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संभाजीराजे भाजप खासदारकीचा राजीनामा देतील अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, प्रत्यक्षात काय होतंय, यासाठी आता २८ तारखेचीच वाट पाहावी लागणार आहे.
Read Also :
- उजनीचा पाणीप्रश्न पेटला, शरद पवारांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ, जयंत पाटलांच्या पुतळ्याचे दहन
- ‘इम्तियाज जलील दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचं काम करतो’
- ‘ट्विटरच्या चिमणीने 56 इंची पोपटाची हवा काढली’
- नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात तातडीने मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणावा – अशोक चव्हाण
- सुबोध जयस्वाल यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती