दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, गेल्या काही दिवसांपासून भाजप तयारीला लागला आहे. मात्र, यावेळी भाजपमध्ये सर्व काही आलबेल असल्याची चिन्हे दिसत नाहीयेत. याचे कारण म्हणजे, काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी आणि उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशभरात चर्चेत आहेत.
यातच आता यावर, राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी देखील भाष्य केले असून, राष्ट्रवादीच काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी यावरून केंद्र सरकार, तसेच पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. ‘मोदी आणि योगी यांच्यातील मतभेद, ही महामारी काळातील केंद्राचे अपयश झाकण्यासाठीची भाजपने ठरवून केलेली खेळी आहे,’ असा आरोप त्यांनी केला आहे.
‘महामारी काळात उ.प्रदेशातील गंगा नदीत अनेक महामारी बाधित लोकांचे मृतदेह फेकण्यात आल्याचे भयाण वास्तव चित्र संपूर्ण देशाने पाहिले. त्यामुळे योगींच्या कारभाराचे पुरते वाभाडे निघाले आहेत. आता आलेले हे अपयश झाकण्यासाठीच मोदी विरुद्ध योगी असे चित्र जाणूनबुजून उभे करण्याची भाजपची रणनीती आहे,’ असं वक्तव्य त्यांनी केले आहे.
तसेच, ‘योगींनी आपल्या ४ वर्षांच्या कार्यकाळात राज्यात फक्त घृणा निर्माण केली. सामान्य जनतेच्या सुखासाठी त्यांनी एकही योजना राबवली नाही. महामारी उच्चाटनाच्या नावाखाली फक्त सरकारच्या तिजोरीतला निधी जाहिरातींवर खर्च करण्यात आला. मात्र, आता उ. प्रदेशमध्ये भाजपचा पराभव होणार हे त्यांना कळून चुकले आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
Read Also :