मुंबई : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी १२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप केल्यांनतर आणि याप्रकरणी सगळे पुरावे ईडीकडे सुपूर्त केल्यानंतर, आज ते पुन्हा एकदा कोल्हापूरला जाणार होते. मुश्रीफ यांच्या बेनामी साखर कारखान्याची माहिती ते कोल्हापूरकरांसमोर मांडणार होते. मात्र, त्याआधीच त्यांच्या घराबाहेर राज्य सरकारने पोलिसांचा मोठा फौजफाटा उभा करून त्यांना स्थानबद्ध केले होते. मात्र या सगळ्याला झुगारून ते घराबाहेर पडले.
सोमय्यांवरील कारवाईनंतर भाजप नेते आक्रमक, कोल्हापूर दौरा होणार?
दरम्यान, त्याआधी त्यांनी मुंबई पोलिसांच्या कारवाईबद्दल संताप व्यक्त केला. ‘माझ्याच कार्यालयात मला ४ तास डांबून ठेवण्यात आले. ही सरकारची आणि मुंबई पोलिसांची कारवाई बेकायदेशीर असून, त्याविरोधात आता आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना योग्य उत्तर देऊ,’ असं म्हणत, ‘कोल्हापूरच्या जिल्ह्याधिकारांकडून जिल्हा बंदीची नोटीस देण्यात आली असली, तरी कोल्हापूरात जाणारच,’ असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
राज्यात लोकशाही संपली? फक्त आणीबाणी घोषीत करायची राहिलीये!
तसेच त्यांनी, ‘उद्या कोल्हापूरला जाऊन राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यांची पाहणी करणार आहे . त्यानंतर २३ सप्टेंबरला पारनेरमधल्या साखर कारखान्याची पाहणी करणार असून, २७ सप्टेंबरला अलिबागला जाऊन कोलाईमधल्या रश्मी ठाकरेंच्या बंगल्याची पाहणी करणार आहे आणि ३० सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संबंधित असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याची पाहणी करणार आहे,’ अशी महत्त्वाची माहिती त्यांनी सांगितली.
कितीही जेलमध्ये डांबले तरी मुश्रीफ, पवारांचे घोटाळे बाहेर काढणार!
दुसरीकडे, भाजपच्या अनेक नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया यावर व्यक्त केली असून, फडणवीस यांनी, ‘माजी खासदार किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील,’ असे सांगितले आहे. तर प्रवीण दरेकर यांनीही, ‘कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी समजू शकतो, पण मुंबईत बंदी का? ही सरकारची हिटलरशाही सहन करणार नाही!’ असा स्पष्ट इशारा दिला आहे.
Read Also :