पुणे : मागील काही दिवसांपासून खेड-शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध शिवसेनेत संघर्ष पराकोटीला गेला आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी ही सल प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. लांडेवाडीत शिवाजीराव आढळराव यांच्या नेतृत्वाखाली सर्वात मोठी पहिली बैलगाडा शर्यत भरवण्यात येणार होती. शर्यतीच्या आधल्या दिवशी रात्री जिल्हाधिकारी सांगतात की शर्यत होणार नाही. झाली तरी फक्त ५० लोकांमध्येच शर्यत झाली पाहिजे. एकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजकीय षडयंत्र रचलं असल्याचे आरोप करत असतानाच दुसरीकडे शिवसेना संपवण्याचा डाव हा जिल्ह्यामध्ये सध्या सुरु आहे. आमचे अस्तित्व राहू द्या. आम्हाला जगू द्या, अशी विनवणी शिवसेना नेते आढळराव करत असताना दिसून येत आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीकडून शिरूरमधील आढाळरावांचे तथा शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याचा डाव रचला जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतील हेवीवेट नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी अनेकवेळा खासदार पदाची भुरळा सांभाळली आहे. दरम्यान, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी आढळरावांना पराभवाची धुळ चारली असली तरी मतदार संघात पाटलांचे वर्चस्व कायम आहे. शिवाय आढळराव हे सुरुवातीपासूनच बैलगाडा शर्यतींवरून महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. दुसरीकडे अमोल कोल्हे हे नवखे असले तरी बैलगाडा शर्यतीचा मुद्दा त्यांनी चांगलाच गाजवला आहे. याच कारणावरून दोघांमध्येही महाविकास आघाडी सरकार असताना समेट झाली नाही. शिवाजीराव आढळराव यांनी भरवलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी लांबून लांबून लोक आले असताना, कोरोनाच्या मुद्यावरून एन रात्री बैलगाडा शर्यत घेऊन नये, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता.
आघाडी सरकारशी देणं-घेणं नाही?
राज्यामध्ये मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा- शिवसेनेमध्ये बिनसल्यावर शिवसेनेने थेट काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापना करत भाजपाला विरोधी बाकांवर बसवले आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रिपद मिळवले. मात्र राज्य पातळीवर ही महाविकास आघाडी आजून देखील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना रुचली नाही. राज्यामध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडी पक्षातील कुरबुरी सध्या समोर येत आहेत. त्यामध्ये आता पुणे जिल्ह्यातील शिवसेना नेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप यावेळी केले आहेत. शिवाय, आघाडीशी आम्हाला देणं-घेणं नाही, आमचं अस्तित्व राहू, अशी विनवणी देखील आढळरावांकडून केली जात आहे.
सांगलीमध्ये शर्यतीला परवानगी मग लांडेवाडीत का नाही?
सांगली जिल्हाधिकारी यांनी दि.३१ डिसेंम्बर रोजी आदेश काढून नांगोळे, ता.कवठे महाकाळ येथे ४ जानेवारी २०२२ रोजी बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे. याच दिवशी ३१ डिसेंम्बर रोजी पुण्याच्या जिल्हाधिकारी यांनी शर्यतींना दिलेली परवानगी रद्द केली. जर सांगली जिल्ह्यात बैलगाडा शर्यत होऊ शकते तर लांडेवाडीत का नाही? माझा संशय चुकीचा नव्हता हेच सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने पुराव्यानिशी अधोरेखित झालं आहे. लोकहो, आता तुम्हीच ठरवा ‘नक्की पाणी मुरतय कुठं?’ अशी पोस्ट शिवाजीराव आढळरावांनी आपल्या फेसबुकच्या माध्यमातून टाकली आहे.
शिवसेना संपवण्याचा डाव?
राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचा उजवा हात असणारा कार्यकर्ता एका शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करतो. का करतो? तर फक्त त्याने आढळरावांचं स्टेट्स ठेवलं म्हणून. हा शिवसेनेवर आणि माझ्यावर होत असलेला अन्याय आहे. वेळोवेळी शिवसेना संपवण्याचा डाव हा जिल्ह्यामध्ये सध्या सुरु आहे. आमचे अस्तित्व राहू द्या. आमची जास्त काही मागणी नाही. शिवसैनिकाला सुखाने तरी जगू द्या असे आढळरावांनी म्हटले आहे. तसेच महाविकास आघाडीविषयी मागील २ वर्षापासून खूप वाईट अनुभव आले आहेत. खेड तालुक्यात पंचायत समितीचे सभापती ६ महिने जेलमध्ये राहावे लागले आहे. लांडेवाडी येथील होणारी बैलगाडा शर्यत रद्द करण्याकरिता अनेकांनी प्रयत्न केले आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये परवानगी मिळाल्यानंतर पहिली बैलगाडा शर्यत आम्ही आयोजित केली होती म्हणून ती इतरांच्या डोळ्यामध्ये जास्त प्रमाणात खूपली आहे, असेही गंभीर आरोप आढळराव यांनी केले आहेत.
राजकीय नेत्यांचे फोटो वापरूनही ‘बारी फेलं’
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 1 जानेवारी रोजी लांडेवाडीत शर्यतीची घोषणा केली होती. गेल्या आठ-दहा दिवसांपासून आढळराव पाटलांची जय्यत तयारी सुरू होती. या शर्यतीसाठीच्या माहितीपत्रकावर शिवसेनेच्या नेत्यासह वळसे पाटील, महेश लांडगे, शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे, राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे यांची छायाचित्रे आवर्जून यात वापरली होती. यात महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याचे संकेत दिले होते. भाजपच्या लांडगे यांनीही बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनाही आढळरावांनी श्रेय दिले. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचे छायाचित्र मात्र त्यांनी वापरले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी ओमिक्रॉनच्या नावाखाली प्रशासनाला हाताशी धरून आढळराव पाटलांची ‘बारी’ घाटात उतरण्यापूर्वीच फेल केली, अशी चर्चा रंगली आहे.
Read also:
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना धक्का; बँकेच्या विजयाचा गुलाल घेत ठरले ‘श्रीमंत अपात्र मजूर’ उमेदवार
- सांगलीत बैलगाडा शर्यत होते मग लांडेवाडीत का नाही? नक्की पाणी मुरतय कुठं? आढळरावांची पोस्ट व्हायरल
- राणे, भाजपकडून पैसा मिळाल्यानेच मी फिरायला गेलो होतो, असं वाईगंणकर म्हणत आहेत – सतीश सावंत
- दानवेसाहेब तुम्ही देशाचे रेल्वे मंत्री आहेत की फक्त जालन्याचे, हे कळतंच नाही; इम्तियाज जलीलांचा टोला
- “चंद्रशेखर बावनकुळेंच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही”, भुजबळांचा पलटवार