पुणे : मराठा आरक्षणाप्रश्नी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे भेट घेतल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणाबाबत आम्ही सांगितलेल्या पाच गोष्टींवर निर्णय घेतला नाही तर ७ जून रोजी रायगडावरून आम्ही आंदोलनाला सुरुवात करू, असा अल्टिमेटम संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
आंदोलनाला अजून 9 दिवस बाकी आहेत. तोपर्यंत मार्ग निघेल, असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. नऊ दिवसातून चर्चेत मार्ग निघेल, असेही ते म्हणाले.
आंदोलनाला अजून वेळ आहे. अजून 9 दिवस बाकी आहे. तोपर्यंत मार्ग निघेल. या नऊ दिवसात खूप काही होईल. चर्चा होईल, मार्ग निघेल, असं पवार म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे संभाजीराजेंना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे अजित पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील मराठा आरक्षणासाठी आदोंलनात सहभागी होणार असल्याचे म्हटले होते. यावर देखील अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. काही लोकांना आंदोलन करण्याची हौस असते. संभाजीराजेंबद्दल मी बोलत नाही. कुणी आंदोलन केलं की हे लोक त्याला पाठिंबा देतात. अरे पण आंदोलन कशासाठी आहे? का आहे? मार्ग काही निघतो का? याची काहीच माहिती हे लोक घेत नाहीत, असा अप्रत्यक्ष टोला नाव न घेता अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.
Read Also :