मुंबई : मराठा समाजासाठी 3 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत पाटलांनी ही मागणी केली आहे.
राज्यात जे ओबीसींना ते मराठ्यांना हे देवेंद्र फडणवीस सरकारचे सूत्र पाळून मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पुन्हा सवलती चालू करा आणि त्यासाठी तातडीने राज्य सरकारने ३ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केले. ते कोल्हापुरात बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाल की, 102 व्या घटनादुरुस्तीनंतरही राज्यांचा एखाद्या जातीला मागास म्हणून आरक्षण देण्याचा अधिकार कायम आहे, हे सिद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. तसा निकाल लागल्यास मराठा आरक्षणाला मदत होणार आहे. परंतु, त्यासाठी राज्य सरकारनेही सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण नाकारणाऱ्या निकालाच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची गरज आहे.
इतर विषयांमध्ये त्वरित निर्णय घेणारे अजितदादा सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांसारख्या मराठा समाजासाठी हिताच्या कुठल्याही विषयाबाबत निर्णय घेत नाहीत याचे फार वाईट वाटते. ‘मराठा समाजाचे नुकसान आम्ही भरून देऊ’ असे म्हणण्यातला अविर्भाव कुठून येतो कळत नाही, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली.
‘जे ओबीसीला तेच मराठा समाजाला’ या तत्त्वावर देवेंद्र सरकारने राजर्षी छत्रपती शाहू शिष्यवृत्ती, डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह योजना, सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अशा अनेक सवलती आणि योजना सुरु केल्या. तशाच योजना महाविकास आघाडीनेही निर्माण कराव्यात, असे पाटील म्हणाले.
Read Also :
- ‘कुठून हे नग मिळतात?’ भाजप नेत्याचा व्हिडीओ शेअर करत आव्हाडांची टीका
- ‘गुणरत्न सदावर्ते नीट बोल, आमच्यात माज काढण्याची ताकद आहे’
- ‘जयंत पाटील-सीताराम कुंटे वादात कोणतेही तथ्य नाही’
- केंद्र सरकारने ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा लेखाजोखा मांडावा, अजित पवारांची मागणी
- मुख्यमंत्र्यांच्या अनियोजित भेटीवरून अखेर पडदा उठला, यासाठी गेले होते न्यायालयात…