मुंबई : नागपूर इथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर आणि अशोक चव्हाणांवर निशाणा साधला. “राज्य सरकारने काही झालं की ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणं थांबवलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी जर केंद्राने करायच्या असतील तर, राज्यांनी काय माशा मारायच्या का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.
तसेच, “१०२ व्या घटना दुरुस्तीनंतरही न्यायाधीशांनी राज्यांचे अधिकार अबाधित राहणार असल्याचे मत मांडले. केंद्र सरकारने देखील असे स्पष्ट केले आहे, तर तीन न्यायाधीशांनी एखाद्या वर्गाला मागास ठरवण्याचा अधिकार केंद्राचा असल्याचे नमूद केले होते. त्यामुळेच हे सर्व अधिकार राज्यांचेच असल्याचे सांगण्यासाठी, केंद्र सरकारने तत्काळ कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करून आपले म्हणणे मांडले. यामुळे राज्य सरकारने केंद्राचे आभार मानायला पाहिजेत”, असे सांगत त्यांनी, “अशोक चव्हाण यांना टीकेची सवयच लागली आहे. त्यांना न्यायालयात आरक्षण टिकवता आले नाही, त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळॆ आपली जबाबदारी झटकून ते सर्वकाही केंद्रावर टाकून देण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा शाब्दिक हल्ला अशोक चव्हाण यांच्यावर केला आहे.
दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण तापले असून, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी काही महत्वाच्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत राज्यपालांची भेट घेऊन, त्यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रपतींना लिहिलेलं पत्र सुपूर्त केलं. यावरूनही फडणवीसांनी ठाकरे सरकारला बोल सुनावले असून, “राज्यपालांच्या हातात काही नसताना देखील सत्ताधारी राज्यपालांना भेटत आहेत. ही सर्व नौटंकी आहे. हा सर्व टाईमपास सुरू आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- फडणवीसांचा नवा डाव, ना मोदी ना पवार थेट लिहिले सोनिया गांधींना पत्र
- खासदार राजीव सातव यांची प्रकृती गंभीर; बाळासाहेब थोरात दुपारी घेणार भेट
- आता या मुद्द्यावर राज्यपालांनीच हस्तक्षेप करावा, रिपब्लिकन पार्टीची मागणी
- फडणवीसांना दुसरं काम काय, भाजपने आता माशा मारण्याची स्पर्धा भरवावी
- ‘अशोकराव, आम्ही सत्ता तुमच्यासारखी चोरून आणली नाही’