मुंबई : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या देशातील महामारीच्या परिस्थितीवरून सातत्याने मोदी सरकारला पत्र लिहीत असून, देशात आलेल्या महामारीच्या दुसऱ्या लाटेवर कशाप्रकारे नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे, केंद्र सरकारने अजून कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. या दृष्टीने त्यांच्या पत्रात काही मुद्दे उपस्थित केलेले असतात.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी मोदी सरकारला अजून एक पत्र लिहिले होते. यात त्यांनी महामारीविरोधातील लढाईत परिणामकारक निकालासाठी लसीला प्राधान्य देण्याच्या धोरणाची गरज अधोरेखित केली होती. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक पत्र सोनिया गांधी यांना लिहिले असून, महाराष्ट्रातील महामारीच्या स्थितीची आणि त्याचा देशावर होणाऱ्या परिणामाची जाणीव त्यांनी याद्वारे काँग्रेसच्या अध्यक्षांना करून दिली आहे.
“देशात झालेल्या एकूण बाधित रुग्णांच्या मृत्यूंमध्ये राज्याचे प्रमाण ३१% असून, सक्रिय रूग्णांचे प्रमाण देखील १४% आहे. त्यामुळे देशाचा महामारीच्या स्थितीचा विचार करताना, महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे राज्याची स्थिती सुधारली, तर केंद्र सरकारच्या संसाधनांवर येणारा ताण कमी होईल आणि या आजारावरील लढा अजून जोमाने लढत येईल. आजच्या घडीला महाराष्ट्राला सर्वाधिक मदत दिली जाते, तरी काहींना पंतप्रधानांवर टीका करणे हे त्यांच्या राजकारणाचे अंतिम ध्येय वाटते”, असे म्हणत त्यांनी केंद्रावर टीका करणाऱ्यांवर आणि प्रामुख्याने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
My letter to @INCIndia President Smt Sonia Gandhi ji..
कांग्रेस अध्यक्षा मा. श्रीमती सोनिया गांधी जी इन्हें मेरा पत्र.. pic.twitter.com/lLOH1AAF33— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 15, 2021
तसेच, राज्य सरकारला आणि काही माध्यमांना मुंबई म्हणजेच महाराष्ट्र वाटतो. परंतु मुंबई सोडून उर्वरित राज्याची महामारीची परिस्थिती पाहिल्यास लक्षात येईल की, हे मॉडेल फसवे आहे. मृत्यू मोठ्या प्रमाणात लपवले जात आहेत. ग्रामीण भागात बेडस नाही, उपचार नाही, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची वानवा आहे. शेवटी न्यायालयांना यात हस्तक्षेप करत आदेश द्यावे लागले आहेत. यालाच ‘महाराष्ट्र मॉडेल’ म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का? असा सवाल करत त्यांनी राज्य सरकाराव देखील शाब्दिक हल्ला केला आहे.
यावेळी त्यांनी, ” सोनिया गांधींनी केंद्रावर टीका करताना, काँग्रेसप्रणित किंवा काँग्रेसच्या पाठिंब्यांवर चालणार्या राज्य सरकारांनासुद्धा सल्ला सल्ला देण्याचे काम केले पाहिजे. आज संपूर्ण जग पंतप्रधानांच्या प्रयत्नांकडे विश्वासाने पाहत आहे. जगातील अनेक देश संकटकाळात मदत देण्यासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे या संकटात केवळ राजकारण न करता काँग्रेस पक्ष एका रचनात्मक विरोधी पक्षाची भूमिका वठवेल, असे लिहीत त्यांनी, ‘ये पब्लिक है, सब जानती है’, असा टोला काँग्रेसला लगावला आहे. दुसरीकडे त्यांच्या या पत्रावरून, “राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला”, असा टोला सत्ताधारी पक्षांनी फडणवीसांना लगावला आहे.
Read Also :
- आता या मुद्द्यावर राज्यपालांनीच हस्तक्षेप करावा, रिपब्लिकन पार्टीची मागणी
- आठवलेंचा आमदार आठवलेंनाच विसरला; आठवले गटात फुट
- फडणवीसांना दुसरं काम काय, भाजपने आता माशा मारण्याची स्पर्धा भरवावी
- ‘कुठून हे नग मिळतात?’ भाजप नेत्याचा व्हिडीओ शेअर करत आव्हाडांची टीका
- ‘मराठा समाजासाठी 3 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा’