मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यातील चार नेत्यांना स्थान मिळाले, मात्र चर्चेत असलेल्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले नाही. यावरून मुंडे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, भाजपकडून मुंडे भगिनींना सातत्याने डावललं जात आहे, असा आरोप करत त्यांनी राजीनामाअस्त्र वापरले आहे. प्रीतम मुंडेंना न्याय मिळावा, या मागणीसाठी आत्तापर्यंत १०५ विविध स्तरावरच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असून, यामुळे भाजपत सध्या गोंधळ उडाला आहे.
…म्हणून तुम्ही दिलेले राजीनामे, मी नामंजूर करते, पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद
या पार्श्वभूमीवर, पंकजा मुंडे यांनी थेट दिल्लीवारी करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली असून, यानंतर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते विनोद तावडे व विजया रहाटकरही होते. त्यानंतर आज त्यांनी नाराज कार्यकर्त्यांची मुंबईमध्ये भेट घेऊन, त्यांच्यासोबत बैठक केली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेतल्या.
“मोठा नेता नेहमीच त्याग करत असतो, मंत्रिपदाची मागणी, हे मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत.”
यावेळी एकदम भावूक होत त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. “माझ्या डोळ्यातील पाणी बघून तुम्ही असे वागला असाल, तर तुमच्या डोळ्यातील पाणी पाहून मी कशी वागू? सांगा! मी हरले, मला संपविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मी संपणार नाही. कारण तुम्ही आहात. मला सत्तेची लालसा नाही, कुठलीही अपेक्षा नाही. तुमच्या प्रेमाच्या ऋणात मी आहे. माझ्या राजकारणाचा पाया माझा परिवार महाराष्ट्रात मुंडे साहेबांवर प्रेम करणारा निष्पाप कार्यकर्ता आहे. माझ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी राजकारणात आहे. त्यामुळे, मी घर सोडणार नाही आणि मी कार्यकर्त्यांना राजीनामा देऊ देणार नाही. तुमचे राजीनामे नामंजूर आहेत,” असं म्हणत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे नामजूंर केले.
मला अनेकांनी संपवण्याचा प्रयत्न केला, पण मी संपले नाही; पंकजा मुंडे कडाडल्या
तसेच, ५ पांडव जिंकले, कारण त्यांच्याकडे संयम होता. मी तोवर धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करणार जोवर शक्य आहे. लक्षात ठेवा, आम्ही कुणालाच भीत नाही; पण कुणाचा निरादारही करत नाही,” असं म्हणत त्यांनी पक्षांतर्गत राजकारणावर देखील बोट ठेवलं. दरम्यान, त्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी, “कौरव कोण, पांडव कोण हे त्यांचं त्यांनीच ठरवावं. त्यांची सेना, त्यांचेच कौरव, त्यांचेच पांडव, अंगणही त्यांचंच आणि महाभारतही तिकडचंच, ते त्यांनाच लखलाभ”, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
Read Also :
- …तेव्हा पंकजा मुंडेंनी अनेकांवर अन्याय केला… आता त्यांच्यावर – विनायक मेटे
- धक्कादायक! खडसेंना क्लीन चीट देणाऱ्या झोटिंग समितीचा अहवाल गायब?
- शिवसेनेला धक्का: दोन बडे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
- पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही; भाजप नेते राम शिंदे म्हणतात….
- महाविकास आघाडीच्या नाटकीपणापासून आत्ताच सावध व्हा; खासदार सुजय विखेंचे जनतेला आवाहन