कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा कायदा दोन वर्षे असताना ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांना अजून नियुक्तीपत्रं देण्यात आलं नाही. कायद्याचा खल केला जात आहे. नियुक्तीपत्रं कसं द्यायचं हे मला शिकवून नका. मी पाच वर्षे खातं संभाळलं आहे. आजच्या आज मराठा तरुणांच्या नियुक्तीचे आदेश काढा, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
मराठा समाजाने कोल्हापुरात निदर्शने आणि लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. काळ्या फिती लावून करण्यात येत असलेल्या या आंदोलनात चंद्रकांत पाटील यांनीही भाग घेतला. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधत राज्य सरकारवर टीका केली. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी जे-जे लोक आंदोलन करतील त्या आंदोलनात भाजपचा झेंडा न घेता आणि भाजपचा कार्यकर्ता असल्याची ओळख न दाखवता आम्ही सहभागी होणार आहोत, असं मी म्हणालो होतो. त्यानुसार आम्ही या आंदोलनात सहभागी झालो आहोत.
कोल्हापुरातील सर्व तालमी, सर्व संघटना आणि मंडळांनी पुढाकार घेऊन हे लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. या लाक्षणिक उपोषणाचं पुढे काय होतं हे माहीत नाही. या आंदोलनात भाजपचा अध्यक्ष म्हणून नव्हे तर नागरिक म्हणून मी आलो आहे, असं पाटील म्हणाले. खासदार संभाजी छत्रपती असो, खासदार उदयनराजे भोसले असो, शिवेंद्रराजे असोत की समरजीतराजे असोत…कुणीही मराठा आरक्षणाचं नेतृत्व करावं. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असंही ते म्हणाले.
Read Also :