मुंबई : ठाकरे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र, आता या निर्णयानंतर भाजप नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे.
‘सरकारला दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या मेव्याचा हेवा’ असल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याची टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही टीका केली.
पडळकर म्हणाले की, काँग्रेस मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या ‘मेव्या’चा ‘हेवा’ या सरकारला आहे. मी यांना जाहीरपणे विचारतो. मेवा मिळत नसेल म्हणून तुम्ही बहुजनांचे हक्क मंत्रिमंडळात मांडत नसाल, तर मी माझ्या बहुजन बांधवांकडून आपल्यासाठी लोकवर्गणीने मेवा जमा करण्याचे आवाहन करू शकतो, असा टोला त्यांनी लगावला.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकरी वीज बिल माफ करा या मागणीऐवजी परमिट रूमवाल्यांना सूट द्या असे म्हणणाऱ्यांकडून यापेक्षा जास्त अपेक्षा नव्हती, असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय यांनी ‘दारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विकली जात होती. दारूबंदी उठवावी अडीच हजार निवेदने दिली होती. अवैद्य आणि डुप्लिकेट दारू जिल्ह्यात विकली जात होती. त्यामुळं दारूबंदीचे दुष्परिणाम दिसू लागले होते. यासंदर्भात एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने दारूबंदी उठवावी यासंदर्भात अहवाल दिला होता. हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला होता’, असे म्हटले आहे.
Read Also :
- … त्यामुळे चंद्रपुरमधील दारु बंदी उठवली, वडेट्टीवारांनी सांगितले कारण
- ‘शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा काय केलं?’
- ठाकरे सरकारने गृह विलगीकरणाचा निर्णय बदलला, आमदार महेश लांडगेंच्या प्रयत्नांना यश
- शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा
- ‘म्युकरमायकोसिसच्या मोफत उपचाराबाबतची सरकारची घोषणा फसवी’