पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत संघर्ष उफाळून आला. आजी-माजी खासदारांनी टोकाच्या भूमिका घेत एकमेकांच्या औकातीपर्यंत येवून ठेपला आहे. आता अमोल कोल्हे यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्ली येथे वृत्तवाहिनीसोबत बोलताना अमोल कोल्हे यांनी स्थानिक पातळीवर भांड्याला भांडं लागणार अशी भूमिका घेतली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे. मात्र, त्या विधनाबाबत चर्चा घडवून आणण्यामागे वेगळा हेतू आहे.
शिरुरचे आजी-माजी खासदार आमने-सामने; रस्ता उद्घाटनाचे श्रेय लाटण्यासाठी आक्रमक!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सरकार व्यवस्तित काम करत आहे. मात्र, स्वार्थासाठी याला कुणीही नख लावू नये. माणूस ज्या भाषेत टीक करतो, त्यातून त्याची संस्कृती कळते, त्यामुळे वैयक्तिक बाबींवर टीका करण्यात मला स्वारस्य नाही. वैयक्तिक चिखलफेक करुन अकारण माझ्या शिरुर मतदारसंघाचं नाव वेगळ्या आणि चुकीच्या कारणासाठी चर्चेत आणणं मला योग्य वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या टीकेवर कुठलंही उत्तर द्यायची मला आवश्यकता भासत नाही. असं म्हणते अमोल कोल्हे यांनी शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तरही दिलं.
नेमका वाद काय?
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. मात्र त्यापूर्वीच म्हणजे कालच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हे उद्घाटन उरकून टाकलं. हा रस्ता आपण मंजूर केला असून, आपणच याचं भूमीपूजन केलं होतं. अमोल कोल्हे केवळ शो बाजी करत आहेत, असा दावा आढळरावांनी केला होता. त्यामुळे त्यांनी रस्त्याचे उद्घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. या माध्यमातून खासदार डॉ. कोल्हे यांच्यावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कुरघोडी केली आहे.
उद्धाटनाप्रसंगी काय म्हणाले होते कोल्हे?
शरद पवारांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर असे वक्तव्य करताना , लॉकडाउनमुळे कार्यक्रम होत नव्हते म्हणून बऱ्याच जणांना व्यक्त व्हायचं होतं. राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतं असणं गरजेचं आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपलं पाहिजे. मात्र महाराष्ट्रात आपण एक प्रवृत्ती अनुभवतोय. ती राज्य पातळीवर पण अनुभवतोय तीच आपण शिरूर मतदार संघातही अनुभवतोय. दुर्दैवाने ती जुन्नर तालुक्यातही अनुभवायला मिळतंय. वयस्कर नेत्यांनं असं पोरकटपणाने वागणं याचं मला आश्चर्य वाटतं.असे अमोल कोल्हे शिरूर येथे बोलले त्या बाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रवक्ता किशोर कान्हेरे यांनी अमोल कोल्हे यांची खरडपट्टी काढली . कलाकार आहात कलाकारच राहा उगाच राजकारणी बनण्याचे नाटक करू नका असा सल्लाही त्यांनी शेवटी खासदार अमोल कोल्हे याना दिला.
अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तरुण आणि म्हातारे असा भेद करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोल्हे करत आहे. मी म्हातारा असलो तरी माझ्याकडे बुद्धिमत्ता आहे. समज आहे. यांच्यासारखा नटसम्राटासारखा नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी स्वत:ची औकात पाहून वक्तव्य करावं. हाच लबाड कोल्हा जेव्हा शिवसेनेतून मोठा झाला. आता शिवसेनेवरच बोलतोय. ज्या पक्षातून मोठा झालो त्यावर टीका करायचा गुणधर्म आहे काय?, असा सवाल आढळराव पाटील यांनी केला आहे.
…अन् शिवाजीराव आढाळराव पाटलांनी खासदार अमोल कोल्हे यांची चक्क औकातच काढली!
पक्षश्रेष्ठी काही समज देणार का?
एकीकडे आघाडीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे सरकार टिकवण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहेत. त्यातच दुसरीकडे खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील धुसफूस आता एकमेकांच्या औकातीवर येवून ठेवली आहे. कारण आढाळराव पाटलांनी थेट अमोल कोल्हेची औकातच काढली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संबंधांना स्थानिक पातळीवर दरी निर्माण झाली आहे. त्यातच आता कार्यकर्त्यांमध्येही मोठी नाराजी निर्माण झाली आहे. यांच्यातील वादाची दरी अशीच वाढत गेली तर आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार शिरूरच्या आजी-माजी खासदारांना काही समज देणार की?, अन्य मार्गाचा अवलंब करणार?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- पांडुरंगाच्या महापूजेला येऊ नका, बंडातात्या कराडकरांची मुख्यमत्र्यांना हात जोडून विनंती
- मनसेचे मिशन २०२२: राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यात पदाधिकाऱ्यांसोबत जोर बैठका
- मुख्यमंत्री आज पंढरपूरकडे रवाना होणार, २० जुलै रोजी सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार
- …तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा; पृथ्वीराज चव्हाण यांचा सल्ला
- मुंबईत पावसाने घेतलेल्या बळींना जबाबदार कोण? महापालिका की नागरिक?