भंडारा : आधी मराठा आरक्षण आणि आता ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकार अडचणीत आले आहे. यावरून विरोधी पक्षाने देखील महाविकास आघाडीला धारेवर धरले असून, “आघाडी सरकारच्या चुकांमुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाले असून, त्यांना न्यायालयात हा विषय हाताळता आला नाही. आज त्याचे परिणाम ओबीसी समाज भोगत आहे. त्यामुळे, स्वतःला ओबीसींचे नेते समजणारे, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी सरकारमधून बाहेर पडावे आणि ते खरे ओबीसी नेते आहेत, हे दाखवून द्यावं,” असं आव्हान ओबीसी खात्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कुटे काँग्रेसच्या नेत्यांना दिले आहे.
हे पण वाचा, “राज्य सरकारकडून मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल”, मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश
संजय कुटे आज भंडारामध्ये पक्षाच्या बैठकीसाठी आले असताना, त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. “पटोले आणि वडेट्टीवार यांच्याकडून सत्ता सुटत नसेल आणि ओबीसींसाठी काही करायचे नसेल, तर त्यांनी आम्हाला शासकीय अधिकार द्यावे. ३ महिन्यांतच गेलेलं ओबीसींचे राजकीय आरक्षण, आम्ही पुन्हा मिळवून देऊ,” असं सांगत, “ओबीसींचे नेते म्हणवून घेणारे पटोले आणि वडेट्टीवार, यांना सत्तेत कुणी मोजत नाही, आता ते केवळ ओबीसी नेते असल्याचा आव आणू शकतात,” असा घणाघात त्यांनी केला आहे.
हे पण वाचा, ओबीसी आरक्षण रद्द केलेल्या ५ जिल्हा परिषदा, ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
दरम्यान, येत्या २६ जूनला भाजपकडून राज्यव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार असून, यावर बोलताना, “मी २६ तारखेच्या आंदोलनाच्या नियोजनासाठी, सहकाऱ्यांसोबत इथे आलो आहे. आम्ही भाजपच्या चार लोकांनी, गेल्या सरकारमध्ये ओबीसी खात्याचा कारभार पाहिला आहे आणि आजही ओबीसींसाठी लढतो आहे. वडेट्टीवार आणि पटोले यांना सत्तेत राहायचेच असेल, तर त्यांनी आम्हाला शासकीय अधिकार देऊन टाकावे. आम्ही ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करतो,” असा हल्लबोल त्यांनी केला आहे.