मुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात 25 जानेवारीला राज्यात महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केले जाणार आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह आघाडीतील अनेक मोठे नेते सहभागी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने शरद पवारांवर निशाणा साधला असून, हे तर पवारांचे स्वतः विरुद्धच आंदोलन असल्याचा टोला भाजपने लगावला आहे.
कृषी कायद्यात सुधारणा करण्याचा वेळोवेळी आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी याच कायद्यातील सुधारणांविरोधात आंदोलन करणे म्हणजे पवारांनी स्वत: विरोधातच आंदोलन पुकारण्यासारखे आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 22, 2021
ज्यावेळी पवार हे कृषिमंत्री होते, तेव्हा स्वामीनाथन आयोगाने सुचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका का घेतली नाही? पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना सर्व राज्य सरकारांना कृषी कायद्यातील सुधारणाविषयक पत्र पाठवली होती. तेच पवार आता या सुधारणांविरोधात आंदोलन करीत आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा?, असा सवाल देखील त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे महत्त्वाचे की केवळ राजकारण करण्यासाठी आंदोलनात उतरणे महत्त्वाचे आहे, असेही उपाध्ये म्हणाले.
दरम्यान, दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी 23, 24, 25 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या 25 जानेवारी रोजी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात होत असलेल्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
Read Also :
- ‘मुख्यमंत्री होण्याची मला कोणतीही घाई नाही’
- काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत सुशीलकुमार शिंदे आघाडीवर?
- ‘लवकरात लवकर नोकरभरती करा, अन्यथा…’, प्रकाश शेंडगेंचा इशारा
- पुणे महापालिकेतील भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार? अजित पवार म्हणाले…
- ट्रम्प यांनी माझं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती – रामदास आठवले