मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असून, यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यापासून मराठा समाजामधून राज्य सरकार विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. या मुद्द्यावरुन एकीकडॆ शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी १ ते ५ जून दरम्यान राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली असून, दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे यांनीदेखील मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाची बाजू ऐकून घेण्यासाठी आणि अभ्यासासाठी महाराष्ट्र दौरा आयोजित केला आहे.
तसेच, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी देखील सरकारला धारेवर धरले असून, हे आरक्षण रद्द होण्याला कारणीभूत आघाडी सरकार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे, तर आधीच्या सरकारने या आरक्षणात आधीपासूनच काही त्रुटी ठेवल्या होत्या, त्यामुळे प्रयत्न करून देखील हे आरक्षण आम्ही न्यायालयात टिकवू शकलो नाही, असा आरोप ठाकरे सरकारकडून भाजपवर केला जात आहे.
यातच आता, ‘मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये. नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होतील,’ असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून मांडण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात ओबीसी महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील पाठवले असून, आता पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये वादंग होण्याची चिन्हे दिसत आहेत.
‘सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर सरकारकडून ओबीसीमध्ये आरक्षणात मराठ्यांचा समावेश करण्याची धडपड सुरु झाली आहे. परंतु, काहीही झाले तरी असे करू नका. आधी ओबीसी समाजाची तात्काळ जनगणना करा. आधीच अनेक ठिकाणी आम्हाला १९ टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे. उलट राज्य सरकारने याविषयकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, नाहीतर ओबीसी समाज देखील आता रस्त्यावर उतरेल,’ असा तेहत इशारा ओबीसी महांसघाने दिला आहे.
त्यामुळे ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून त्यांच्या पाठीमागे लागलेले शुक्लकाष्ठ काही संपण्याचे नाव घेण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. यातच धनगर समाज देखील आक्रमक झाला असून, आरक्षणासाठी येत्या ३१ मे ला धनगर समाजाने जागर करावा, असं आवाहन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. तसेच, शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका देखील दाखल केली आहे.
Read Also :
- कोकणवासीयांना मदत मिळणार, कुणालाही वंचित ठेवणार नाही – मुख्यमंत्री
- मराठा आरक्षण : विनायक मेटेंनी ठाकरे सरकारला खेचले न्यायालयात
- ‘मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहणाऱ्या संभाजीराजेंसाठी वेळ नाही, पण अभिनेत्रींना भेटायला वेळ आहे’
- रेड झोनमधील जिल्ह्यामंध्ये होम क्वारंटाईन बंद! ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!
- मराठ्यांपाठोपाठ धनगर समाजही आक्रमक; आरक्षणासाठी ३१ मे’ला जागर करणार