मुंबई : काँग्रेस नेते राजीव सातव यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ऑनलाईन श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या आठवणीने भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
राजीव सातव यांचे निधन झाले यावर आजही विश्वास बसत नाही, त्यांच्या निधनाने सातव परिवारावर जेवढा मोठा आघात झाला आहे तेवढाच आघात काँग्रेस पक्षावरही झाला आहे. राजीव यांची दोन कुटुंबं होती एक त्यांची आई, पत्नी व मुले आणि दुसरे काँग्रेस पक्ष. राजीवमध्ये एक चमक आहे हे पहिल्याच भेटीत दिसले होते, त्यांनी नेहमी पक्षासाठी उत्तम काम केले. राजकारणात त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. राजीव कधीच कोणाबद्दलही वाईट बोलत नसे. लोकसभेत काँग्रेस पक्षाते ४५ सदस्य असताना ते ५-७ व्यक्तीचे काम एकटेच करत असत. राजीव यांच्या निधनाने मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला आहे, अशी भावना यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधीजी म्हणाल्या की, राजीव यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे यावर विश्वास बसत नाही. अत्यंत शांत स्वभावाचा, पक्षाशी निष्ठा असणारा, कामाच्या जोरावर पक्षावर विविध भूषवणारे, पक्ष कार्याला प्रथम महत्व देणारे राजीव यांचे एवढ्या कमी वयात निधन होईल असे वाटले नव्हते. ते एक लढवय्या नेता होते. पण कोरोनाविरुद्धची लढाई ते हरले.
राजीव सातव हे उमदे नेतृत्व तसेच पक्षाचे भविष्य होते. कोरोनाने त्यांना अकाली हिरावून घेतले. शेतकरी, कामगारांसाठी लढणारा नेता अशी त्यांची ओळख होती.लोकसभेत त्यांच्याबरोबर काम केले. राजीव यांच्या निधनाने पक्षाची व वैयक्तीक मोठी हानी झाली असल्याची भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.
ऑनलाईन श्रद्धांजली सभेत खा. राहुलजी गांधी, प्रियंका गांधी, विरोधी पक्षनेता राज्यसभा मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील चाकूरकर. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस मुकुल वासनिक, के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेता तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, दूग्धविकास मंत्री सुनिल केदार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, उपाध्यक्ष मोहन जोशी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, आ. अभिजित वंजारी तसेच काँग्रेसचे खासदार, आमदार आदी सहभागी झाले होते .
Read Also :
- ‘गुजरातचा PM गुजरातच्या दौऱ्यावर…बाकीची राज्य वाऱ्यावर!’
- ‘युट्यूबकडून मिळतात ‘इतके’ पैसे’, गडकरींनी सांगितला आकडा
- ‘बार्जमधील निष्पापांच्या मृत्यूला ONGC प्रशासन जबाबदार’
- ‘मोदी गुजरात तर फडणवीस कोकण दौऱ्यावर, मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईचा तरी करा’
- ‘गतवर्षी आलेल्या निसर्ग वादळाची आधी “तातडीने” भरपाई द्या’