मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने राज्याच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हानी घडवली आणली असून, दोन्ही सभागृहांच्या विरोधी पक्षनेत्यांसोबतच, राज्याच्या मंत्रीमंडळातील इतर मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी देखील कोकणचा दौरा केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेला कोकण दौरा हा विरोधकांसाठी आता टीकेचा विषय बनला असून, भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर टीकेची झोड उठवली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यानावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत धावून आले असून, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, ‘नारायण राणे पनवती आहेत, म्हणूनच भाजपत त्यांना अडगळीचं स्थान आहे,’ असा खोचक टोला लगावला आहे.
“भाजपनं पनवती आहेत म्हणूनच राणेंना अडगळीत टाकलेलं आहे. त्यांना कावीळ झाली असून, ते अजूनपर्यंत कोकणात गेलेले नाहीत. भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणून नारायण राणेंचा उल्लेख होतो. त्यांच्याच रुग्णालयात RT-PCR चाचणीसाठी सामान्य दरापेक्षा जास्त पैसे घेतले जात आहेत. मोठाले भूखंड हडप करणारा माणूस म्हणजे नारायण राणे”, अशी सणसणीत टीका त्यांनी राणेंवर केली आहे.
तसेच, त्यांनी कोकणात केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल लवकरच करणार असल्याचा इशारा देखील राऊत यांनी दिला असून, ‘सिंधुदुर्ग भवन कसं बनलं, कोकणवासीयांची लुबाडणूक करून भूखंड कसा लाटला, या सगळ्या गोष्टी लवकरच बाहेर येतील, त्या आम्ही लोकांना सांगणार आहोत,’ असा थेट इशारा देखील त्यांनी नारायण राणे यांना दिला आहे. यावेळी, मातोश्रीत शांती यज्ञ घालण्याचा सल्ल्यावरून राणेंवर शाब्दिक हल्ला चढवताना त्यांनी, “नारायण राणेंनी बाकीच्यांना सल्ला देऊ नये. स्वत:च्या घरात आधी शांती घालावी. मुंबईतली ‘वर्षा’ व ‘मातोश्री’ ही दैवतांची घरे आहेत. त्यांना या विषयी बोलणं शोभून दिसत नाही”, असा खोचक टोला त्यांनी हाणला आहे.
Read Also :
- पदोन्नतीतील आरक्षणाचा जीआर रद्द न केल्यास, काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार
- लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का?
- ‘…तोवर राज्यातल्या लॉकडाऊन मध्ये कोणताही दिलासा नाही’, ठाकरे सरकार घेऊ शकतं निर्णय
- ‘आपलं इतक्या वर्षांचं नातं क्षणात…सगळे खंबीर राहा!’, राज ठाकरेंचे मनसैनिकांना भावनिक पत्र
- सचिन सावंत म्हणजे “उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग”