सोलापूर : राज्यात उजनीचा पाणी प्रश्न अजूनच चिघळला असून, यावरून काल पुण्यात जलसिंचन भवनात बैठक बोलावली गेली होती. मात्र यावेळी इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्याचे शेतकरी थेट जलसंपदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर एकमेकांशी भिडल्याची घटना घडली. दरम्यान, या वादावर तोडगा काढण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे देखील उपस्थित होते.
सोमवारी उजनीच्या पाणीप्रश्नावरून दोन्ही जिल्हयातील शेतकऱ्यांची, जलसिंचन भवनात बैठक बोलावली होती. परंतु, या बैठकीतून काही तोडगा निघण्याऐवजी, दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी थेट सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोरच एकमेकांशी भिडले. त्यामुळे तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र यावर अजूनही तोडगा अजूनही निघू शकलेला नाही.
या घटनेबाबत बोलताना जनहितचे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले, “पुण्यात उजनी पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री भरणे यांनी आम्हाला बोलावल्याचं नाटक केलं, पण आमच्या आधीच आंदोलन दडपण्यासाठी त्या ठिकाणी इंदापूरचे शेतकरी आणि सेनेचे कार्यकर्ते होते. त्यामुळे आम्ही त्यांना उजनीतील एक थेंबही पाणी नेऊ देणार नाही, असा आम्ही एकमताने निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, उजनी धरणातील सोलापूर जिल्ह्यासाठी राखून ठेवलेल्या पाणीसाठ्यातील एक थेंबही पाणी मी इंदापूरला नेले आहे, हे सिद्ध करून दाखवले, तर मी मंत्रिपद आणि आमदारकी सोडून राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केले होते. यावर उजनी धरण पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी, “दत्तात्रय भरणेंनी जे सांगितले ते खोटे आहे, भरणे हे चोर आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दरोडेखोर आहेत. त्यांनी आमच्या हिश्याचं पाणी चोरलंय, त्यामुळे यापुढचं आंदोलन आम्ही गोविंद बागेत करू, असा इशारा दिला आहे.
Read Also :