मुंबई : देशातल्या महामारीच्या परिस्थितीवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. तसेच, केंद्र सरकार दुसऱ्या लाटेला रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका अनेक राजकीय पक्षांकडून मोदी सरकारवर ठेवण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट एक पत्र सोनिया गांधींना लिहून, त्यांना, त्यांचे सरकार असलेल्या महाराष्ट्रातील स्थितीची आणि त्याचा संपूर्ण देशातील महामारीच्या लढ्यावर होणाऱ्या परिणामाची जाणीव करून दिली.
दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी, फडणवीस यांच्यावर टीका केली असून, जगभर महाराष्ट्राच्या कामाची नोंद घेतली जात आहे. मुंबई मॉडेलची सर्वदूर चर्चा आहे. याच गोष्टी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याना पचत नसल्याने, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून त्यांनी, महाराष्ट्राबद्दल खोटी बातमी पसरवण्याचे काम केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
“महामारीच्या बाबतीत राज्य सरकार गंभीरतेने काम करत असून, बाधित रुग्णांचा आकडा किंवा मृतांचा आकडा कुठेही लपवला जात नाहीये. राज्यात आत्तापर्यंत ६ हजार २०० लॅब तयार करण्यात आल्या आहेत. तसेच, जास्तीत जास्त आरटीपीसीआरच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. ही सर्व माहिती जनतेसमोर आहे”, असे सांगत त्यांनी, “सुप्रीम कोर्ट असेल किंवा नीती आयोग, राज्याच्या महामारीविरुद्धच्या कामाची प्रशंसा केली आहे, नेमके हेच फडणवीसांना पचत नाहीये,” अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.
तसेच, गुजरातमध्ये ७१ दिवसात ६१ हजार बाधित रुग्णांच्या केसेस लपवण्यात आल्याची बातमी समोर ऐकिवात आहे. गोव्यात देखील ऑक्सिजन नसल्याने लोकांचे मृत्यू होत आहेय. उ.प्रदेशमध्ये तर २ हजार लोकांचे मृतदेह नदीमध्ये फेकण्यात आल्याची बातमी आहे. त्यामुळे हा महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा उद्योगच सुरु झाला असल्याचा घणाघात मलिक यांनी केला आहे.
Read Also :