मुंबई : प.बंगालच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर, देशभरातून मोदी सरकारवर टीका केली जात आहे तर, बंगालच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झालेल्या ममता बॅनर्जी यांची वाहवा केली जात असून, राज्यात देखील भाजपाला विरोध करणाऱ्या पक्षांनी भाजपच्या पराभवावर तोंडसुख घेतले आहे.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे देखील सातत्याने, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपवर टीका करत असतात. आज (रविवार) च्या दैनिक सामनामधून देखील त्यांनी ‘मोदी-शहा का हरले’ हा लेख लिहीला असून, त्यावरून भाजपने संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेले संजय काकडे यांनी, या लेखाच्या संदर्भाने राऊत यांच्यावर हल्लाबोल केला असून, ‘हा लेख लिहून राऊत यांनी स्वत:च्याच राजकीय अपरिपक्वतेचे दर्शन घडवले आहे. संजय राऊत हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी अभ्यासपूर्ण लिखाण करावे ही अपेक्षा आहे मात्र, डोळ्यावर पट्टी बांधून आणि अर्धवट माहितीवर लिखाण करण्याचे काम आता संजय राऊत यांनी थांबवावे, अशा रोखठोक शब्दांत संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘रोखठोक’ सदरातील लेखाचा समाचार घेतला आहे.
यावेळी त्यांनी, आमच्याबरोबर ३० वर्षे युतीत राहिलेल्या संजय राऊतांनी कुणाच्या विजयाचा आनंद मानावा हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु, ते जो आनंद व्यक्त करीत आहेत. त्या प.बंगालमधील निवडणुकीची वस्तुस्थिती त्यांनी लक्षात घ्यावी आणि मग लिहावे. तसेच, संजय राऊत यांनी शिवसेना भाजपबरोबर असताना त्यांचा आलेख कसा होता आणि आता कसा आहे? याचादेखील वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडावा,’ असा टोला राऊत यांना लगावला आहे.
संजय राऊत यांनी शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाचं विश्लेषण करताना भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधताना, “खोटा प्रचार व बदनामी ही निवडणुकीतील शस्त्रं आता जुनाट व बोथट झाली आहेत. याच न्यायानं उद्या मोदी व शहांच्या प्रतिमांना गंज चढेल. ते होऊ द्यायचं नसेल तर त्यांना स्वतःला बदलावे लागेल,”अशी टीका केली आहे.
Read Also :
- फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि…आमदार कपिल पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
- दैनिक सामनामधून ममता बॅनर्जी यांची, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांशी तुलना
- महामारी, तिसरी आघाडी आणि काँग्रेसवर संजय राऊतांचे मोठे भाष्य, म्हणाले…
- ‘ही तर राज्य सरकारची त्रिसूत्री, एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती!’, भाजपकडून ठाकरे सरकारवर हल्लबोल
- सचिन सावंतांचा भाजपवर पलटवार, म्हणाले ‘मनोरा आमदार निवास’ची किंमत…