मुंबई : देशात महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले आहे. एकीकडे महामारीने बाधित रुग्णांचा जीव जात असून, दुसरीकडे ऑक्सिजन न मिळाल्याने या आजारातून बरे होत असलेल्या रुग्णांचा हकनाक जीव जात असल्याचे चित्र देशभरात पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर देशात ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, लस यांचा देखील मोठा तुटवडा जाणवत आहे. मात्र, यावरून देशात तसेच राज्यात देखील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणावर झडताना दिसत आहेत.
दरम्यान, देशातल्या या परिस्थितीवरून, राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर ट्विट करून, “राम राज्य”चे गाजर दाखवणाऱ्यांनी, देशाला रामभरोसे गंगेत सोडून दिले”, अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भाजपचे नेते, आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले असून, “नवाब मलिक कमी बोलले, तर अडचणी कमी होतील,” असे त्यांनी म्हटले आहे.
केवळ केंद्र सरकारला टार्गेट करून आणि दुसऱ्या राज्यांतील स्वतःच्या सोयीची असलेली उदाहरणे देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न मंत्री नवाब मलिक करतात. त्यामुळे ते जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील.@BJP4Maharashtra pic.twitter.com/207HtQT4a2
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 11, 2021
तसेच, “देशात रुग्णवाढ होत असताना आणि देशाला तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो अशी स्थिती असताना, स्वतःच्या सोयीची उदाहरणं घेऊन केवळ केंद्र सरकारवर निशाणा साधायचा आणि राजकारण करण्याचा प्रयत्न करायचा,” अशा शब्दात त्यांनी मलिकांवर टीका केली आहे.
यावेळी, “केवळ इतर राज्यांची उदाहरणे देताना, त्या राज्यांनी ज्या चांगल्या उपाययोजना, चांगल्या गोष्टी केल्या, तशाच प्रकारच्या उपाययोजना आपल्याकडे अंमलात आणण्यासाठी राज्य सरकारने काय केले, याचे मात्र नवाब मलिक उत्तर देऊ शकत नाहीत. त्यामुळे केंद्र आणि राज्य असा वाद या काळात बंद करण्याची आवश्यकता आहे,” असे देखील दरेकर यांनी यावेळी सांगितले.
Read Also :