मुंबई – विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरुन महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अध्यक्षाची निवड आवाजी मतदानाने करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यावर हे सरकार घाबरलेलं आहे. या सरकारला स्वत:च्या आमदारांवरही विश्वास नाही, असा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याचबरोबर सभागृहात कोणकोणत्या विषयांवरुन सरकारला घेरलं, त्याची माहितीही फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
हिवाळी अधिवेशनात फडणवीसांची पहिलीच मागणी अजित पवारांनी केली मान्य..
सरकारवर हल्लाबोल चढवताना फडणवीस म्हणाले की, ‘अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जो प्रस्ताव आज मांडण्यात आला त्यातून हे सरकार किती असुरक्षित आहे हे लक्षात आलं. 60 वर्षापर्यंत अध्यक्षांची निवडणूक गुप्त पद्धतीने झाली. अगदी जेव्हा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये फक्त 5 – 7 मतांचा फरक होता तेव्हाही ही निवडणूक गुप्त पद्धतीने झाली. पण 170 आमदार आमच्याकडे आहेत असं सांगणाऱ्या महाविकास आघाडीला ओपन पद्धतीनं ही निवडणूक घेण्याची नामुष्की ओढावली. कारण त्यांच्यातील असंतोष इतका भयानक आहे की त्यांना खात्री आहे की त्यांचे आमदार हा असंतोष अध्यक्षांच्या निवडणुकीत व्यक्त करतील आणि त्यांच्यावर नामुष्की ओढावले. म्हणून त्यांनी नियम बदलाचा घाट घातला’.
फडणवीस म्हणाले की, ‘हे करत असताना इतक्या घाईगर्दीत हे सगळं करण्यात आलं की नियम समितीच्या बैठकीत अवहाल तयार करुन केवळ भाजपच्या नियम समिती सदस्यांना निमंत्रणही देण्यात आलं नाही. त्यांचं बहुमत असतानाही त्यांनी भाजप सदस्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. तरी दुसऱ्या बैठकीत भाजप सदस्यांनी त्यावर डिसेंट नोट दिली. आज सभागृहात हा रिपोर्ट आला असताना 10 दिवसांचा कालावधी केला पाहिजे. आक्षेप आला तर ते पुन्हा समितीकडे दिलं पाहिजे. त्यानंतर पुन्हा ते सभागृहात आणलं पाहिजे. ही सगळी पद्धत डावलून चुकीच्या पद्धतीने नियम 57 चा उपयोग करत अत्यंत घाईने 10 दिवसांची मुदत 1 दिवसांवर आणली. आपण जर यात पाहिलं तर आम्ही पोल मागत होतो. पण पोलही याठिकाणी देण्यात आला नाही. सरकार किती घाबरलं आहे हे स्पष्ट होतं. आपल्या आमदारांवर विश्वास नसलेलं असं सरकार इतिहासात कधी पाहिलं नाही, अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केली आहे.
Read also:
- पुणे जिल्हा बॅंक निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे आणि जगदाळे बिनविरोध..!
- …तर महाराष्ट्रातील शाळा पुन्हा बंद होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच मोठं वक्तव्य
- फडणवीसांच्या मनात ‘ती’ सल असल्यामुळेच मला माफी मागायला लावली – भास्कर जाधव
- “..अशा धंद्यांमुळे पुढच्या निवडणुकीत हे नक्की पडतील”, नक्कल प्रकरणावरुन मुनगंटीवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा
- अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा चार्ज दिला, तर 4 दिवसांत राज्य विकतील – गोपीचंद पडळकर