मुंबई : राज्यातील महामारीच्या बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरुवातीला १५ दिवस कडक निर्बंध लागू केले. मात्र, रुग्णसंख्येत सातत्याने होत असलेली वाढ पाहून, लॉकडाऊन मध्ये देखील हळूहळू राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आणि सध्या राज्यात १ जूनपर्यंत कडक निर्बंधांसह लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
दरम्यान, १ जूननंतरही राज्यातील लॉकडाऊन पुढे वाढवला जाणार का? हा प्रश्न नागरिकांच्या मनात येत होता. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सुचक वक्तव्य केलं असून, ‘आम्ही संपूर्ण तयारीचा आढावा घेऊ आणि सर्व गोष्टी सकारात्मक असतील, तरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री टास्क फोर्समधील तज्ज्ञांशी चर्चा करून, निर्बंधांमध्ये शिथीलता आणण्याचा विचार करु शकतात. मात्र, निर्बंध एकदमच उठवले जातील या भ्रमात कुणीही राहू नये’, असा इशारा दिला आहे.
तसेच, केंद्राने लसीकरणासाठी राष्ट्रीय धोरण जाहीर करावं. तिसऱ्या टप्प्यातील १८ चे ४४ वर्षे वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी ही राज्यांकडे असेल, तर आम्ही तुम्हाला पैसे देतो, आम्हाला लस खरेदी करायला परवानगी द्यावी,’ असं आवाहन त्यांनी मोदी सरकारला केलं आहे.
आज राज्यातला (ब्लॅक फंगस) म्युकरमायकोसिसचा वाढणारा प्रादुर्भाव आणि त्याच्या उपचारासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांची असलेली कमतरता यासंदर्भात आघाडी सरकारची मंत्रालयात महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. तसेच, त्यांनी राज्यातील सध्याच्या महामारीच्या परिस्थितीचा देखील यावेळी आढावा घेतल्याची माहिती दिली.
या बैठीकीतले महत्वाचे मुद्दे आणि निर्णय…
- आशा सेविकांना महामारीच्या चाचण्या करण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार.
- जनरल टेस्टिंग बंद करुन फोकस टेस्टिंगवर भर देण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश.
- सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, राज्यातल्या सर्व रुग्णालयांची अग्निसुरक्षा तपासणी प्राधान्यानं करुन घेण्याच्या सक्त सूचना.
- ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी लागणाऱ्या ‘अँफोटेरीसीन बी’ या औषधासाठी जागतिक निविदा काढण्याबद्दल सूचना जारी.
- ‘अँफोटेरीसीन बी’ च्या ६० हजार कुप्या १ जून पर्यंत राज्याला मिळणार.
- म.फुले जनआरोग्य योजनेच्याअंतर्गत ब्लॅक फंगसवर पूर्णपणे मोफत उपचार रुग्णालयातून देण्यात येण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. तसेच, खासगी रुग्णालयात देखील उपचार मोफत व्हावेत यासाठी प्रयत्न सुरु.
- रेड झोनमधील जिल्ह्यांसाठी गृहविलगीकरण पद्धत पूर्णपणे बंद.
- ब्लॅक फंगसच्या प्रत्येक रुग्णाची नोंद ठेवली जाणार. (सध्या २२४५ रुग्ण)
- ब्लॅक फंगसबाबत जनजागृती करण्यात येणार.
- मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत राज्यातल्या लॉकडाऊनबद्दल निर्णय घेतला जाणार
- राज्याचा महामारीचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ % तर सक्रिय रुग्णांचे परिमाण १२%. तसेच, मृत्यूदर १.५ % घटला.
- लसीकरणाच्या जागतिक निविदेला कोणत्याही राज्याला प्रतिसाद नाही. त्यामुळे, केंद्रानं जागतिक निविदा काढून राज्यांना लस द्यावी.
दुसरीकडे राज्यात १ जून नंतर काही जिल्ह्यांत ४ टप्प्यांमध्ये लॉकडाऊन उठवण्यात आला, तर ४ टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यात दुकानांना स. ७ ते दु. २ वाजेपर्यंत विक्री करण्यास परवानगी दिली जाऊ शकते, तर दुसऱ्या टप्प्यात दैनंदिन गरजांशी निगडित दुकानांना पर्यायी दिवसांवर चालू करण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच, उपाहारगृहे आणि धार्मिक स्थळे तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात उघडण्यात येऊ शकतात.
Read Also :
- ‘अखेर फोन टॅपिंग प्रकरणात नोंदवला गेला, रश्मी शुक्लांचा जबाब’
- Big Breaking : दहावीच्या परिक्षांविषयी राज्य सरकार जीआर काढणार
- उजनी पाणी प्रश्न : ‘५ टीएमसी पाण्यासाठी आता पुढचे आंदोलन थेट गोविंदबागेत’
- मराठ्यांपाठोपाठ धनगर समाजही आक्रमक; आरक्षणासाठी ३१ मे’ला जागर करणार
- मदतीचा हात.! कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना भाजपचा ‘आधार’