मुंबई – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे सत्ताधाऱ्यांचा चहापानाचा कार्यक्रम पार पडला. मात्र, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्यक्षपणे सहभागी नव्हते. मात्र, त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली. सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या चहापानाच्या कार्यकर्मावर विरोधकांनी मात्र बहिष्कार घातला. तसंच हिवाळी अधिवेशात विविध मुद्द्यांवर सरकारला घेरणार असल्याचं विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण तापणार असल्याचं आता स्पष्ट आहे.
‘राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची कोणतीही कारणे राज्य सरकारने शिल्लक ठेवली नाहीत’
सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यकर्माला काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, दीपक केसरकर, अंबादास दानवे आदी नेत्यांनी उपस्थिती लावली. तर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडेंनीही चहापानाला उपस्थिती लावली. दरम्यान, चहापानापूर्वी अतिथीगृहातील समिती कक्षात चहापानापूर्वी विधिमंडळ सदस्य शेकापचे जयंत पाटील, लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रारंभी स्वागत केले.
चहापानाच्या कार्यक्रमानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक सध्या सुरु झाली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित आहेत. या बैठकीत विरोधकांच्या आरोपांना कशा प्रकारे प्रत्युत्तर द्यायचे, त्यांचे मुद्दे कसे खोडून काढायचे आणि महत्वाचे प्रस्ताव, विधेयकांवर चर्चा होणार असल्याचं स्पष्ट आहे.
राज्यातील आघाडी सरकारने आम्हाला पहिल्यांदाच चहापानाचं आमंत्रण दिलं आहे. पण राज्यात अनागोंदी कारभार सुरू आहे. हे सरकार कोणत्याच मुद्द्यावर संवेदनशील नाही. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्ही सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच राज्यातील 8 प्रमुख मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला घेरणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
Read also:
- “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जानकरांनी वाद निर्माण करू नये”
- नगरपंचायतीत मोठंमोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, मतदारांचा कौल कुणाला मिळणार?
- शिरुर मतदारसंघाची अवस्था म्हणजे… “धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का”
- नगरपंचायत निवडणुकीला हिंसाचाराचं गालबोट; महाविकास आघाडी आणि भाजपा समर्थकांमध्ये तुफान हाणामारी
- ‘वाह रे MVA तेरा खेल, सस्ती दारु, महंगा तेल’, फडणवीसांची चौफेर टीका