पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी चिचोडी- आंबेगाव आणि नानोलीतर्फे चाकण ता. मावळ येथील बैलगाडा शर्यतीची परवानगी पुढील आदेश येईपर्यंत स्थगित ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश आहेत. मात्र, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कारण माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथे आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीला दिलेली परवानगी अचानक रद्द केल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. या शर्यतीसाठी आढळरावांनी जोरदार तयारी केली होती. या शर्यतीसाठीच्या माहितीपत्रकावर शिवसेनेच्या नेत्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, भाजपचे आमदार महेश लांडगे यांचेही छायाचित्र त्यांनी घेतले. तरीही आढळरावांच्या शर्यतीत खोडा घालण्यात आला.
दरम्यान, ऐनवेळी शर्यत रद्द करण्याचा घाट घातला, यामागे राजकीय षडयंत्र असल्याचे दिसून येते, अशा शब्दात आढाळाराव पाटलांनी रोष व्यक्त केला. परंतू, व्यक्त होत असताना पाटलांचा रोख नेमका कुणाकडे होता? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण आढाळराव पाटलांनी राजकारण करणाऱ्यांचे नाव घेतले नाही. शर्यतीच्या माहितीपत्रकावर वळसे पाटील, महेश लांडगे, शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे, राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे यांची छायाचित्रे आवर्जून यात वापरली होती. यात महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याचे संकेत दिले होते. भाजपच्या लांडगे यांनीही बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनाही आढळरावांनी श्रेय दिले. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचे छायाचित्र मात्र त्यांनी वापरले नाही. कोठेतरी माशी शिंकली आणि शर्यती रद्द झाल्या. हे शर्यत रद्द होणार असल्याची पूर्वसूचना एका फौजदाराने त्यांना काल (शुक्रवारी) रात्री दिली होती.
राज्यात लॉकडाऊन लागणार नाही, परंतू निर्बंध अजून कडक करणार – राजेश टोपे
त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कोणी दाद दिली नाही. त्यानंतर रात्री 11.30 च्या सुमारास शर्य़तीला परवानगी नाकारत असल्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. या साऱ्या प्रकाराबद्दल आढळरावांनी नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱयांनी ताळतंत्र सोडत हा निर्णय घेतल्याची टीका केली. ही स्थगिती दिल्याने आयोजक, बैलगाडा मालक, शेतकरी नाराज होत, प्रशासनाच्या विरोधात लांडेवाडीच्या घाटात शनिवारी (ता.१) सकाळी धरणे आंदोलन केले. या वेळी आढळराव यांच्यासमोरच समर्थकांनी महाविकास आघाडी आणि जिल्हा प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
राज्यातील १० मंत्र्यांना, २० आमदारांना कोरोनाची लागण; अजित पवारांची धक्कादायक माहिती
आढळराव पाटील म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या भावनांशी जर कोणी खेळत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. साडेसात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर अशाप्रकारे जिल्हा प्रशासनाने रात्रीच्या अंधारात निर्णय जाहीर करणे हे मला कुठे तरी चुकीचे आणि काळे-बेरे वाटले. जिल्हाधिकारांच्या निर्णयांचा आम्ही सन्मानच करतो, पण त्यांनी काहीसा आधी हा निर्णय जाहीर करायला हवा होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने संध्याकाळी ६ वाजता फोन करून उपाययोजनांचा अहवाल पाठवायला सांगितला. त्यानंतर या अहवालावर समाधान व्यक्त करत चांगल्या उपाययोजना असल्याचे सांगितले. मात्र रात्री ८ वाजता पोलिसांनी येऊन सांगितले, की कदाचित तुम्हाला बैलगाडा शर्यती स्थगित करायला लागेल आणि त्यानंतर ११ वाजता जिल्हाधिकारी आदेश काढतात, हे कुठेतरी चुकीचे आहे. या निर्णयामागे राजकारण आहे.’’
सूडबुद्धीने गुन्हे दाखल करून नारायण राणेंना नमवण्याचा प्रयत्न; रावसाहेब दानवेंचा गंभीर आरोप
लांडेवाडीत आढळरावांच्या नेतृत्वातच महाराष्ट्रातील सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत पार पडणार होती. पण ही गोष्ट काही लोकांना पटली नाही, त्यांच्या डोळ्यात खुपत होती, त्यामुळेच ही शर्यत बंद पाडण्यात आली, असा आरोपही त्यांनी नाव न घेता केला. पण हे कोणी केले, याचे नाव त्यांनी जाहीर केले नाही.
Read also:
- महाविकास आघाडी सरकार हद्दपार करणार; नव्या वर्षी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा संकल्प
- राज्यात लॉकडाऊन लागणार नाही, परंतू निर्बंध अजून कडक करणार – राजेश टोपे
- पंढरपुरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांत जोरदार खडाजंगी; दोन्ही गट आमने-सामने
- आम्ही तोंडातून वाफा काढत नाही, जे बोलतो ते करतो; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं
- मुंबईकरांना ठाकरे सरकारकडून नववर्षांचं मोठं गिफ्ट; 500 स्क्वेअर फूट पर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ