मुंबई : अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी विरोधी पक्षाच्यावतीने विधान परिषदेत नियम २६० अन्वये प्रस्ताव मांडण्यात आला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी नुकसानग्रस्त जनतेच्या मदतीसाठी राज्य सरकारकडे काही मागण्या मांडल्या. राज्यात पावसामुळे व पुरामुळे अनेक भागात अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांची हानी झाली, जनावरे वाहून गेली, वीज पुरवठा बंद पडला अशा अनेक समस्या अजूनही भेडसावत आहेत. मागील दीड महिन्यापासून जनता हवालदिल झाली असताना राज्य सरकारने खातेवाटप झाले नसल्याने सर्व जबाबदारी प्रशासनावर सोपवली. अनेक ठिकाणी मदत अजूनही पुरवली गेलेली नाही. त्यामुळे राज्य सरकार किती दिवसात ही मदत पुरवेल याची माहिती जाहीर करण्याची मागणी खडसे यांनी केली.
“देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार”; ब्राम्हण महासंघाचं अमित शाहांना पत्र
एनडीआरएफच्या निकषांनुसार मिळणारी मदत अत्यंत तुटपुंजी आहे. महागाई इतकी वाढली आहे की हे निकष बाजूला ठेवून दुप्पट मदत केली तरी ती समाधानकारक नाही. यासाठी राज्य सरकारने महागाई जेवढी वाढली आहे तेवढ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. पुरामध्ये एखादी व्यक्ती, जनावरे वाहून गेली तर त्यांच्या कुटुंबाला होणाऱ्या मदतीमध्येही वाढ झाली पाहिजे. तसेच दरवर्षी पुराचा वेढा बसणाऱ्या गावांसाठी वेगळा आराखडा तयार करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. पावसामुळे पीकांचे नुकसान झालेय, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर व्हायला हवा अशी मागणी त्यांनी केली. उत्तर महाराष्ट्रात केळीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्याला किचकट प्रक्रियेत ही मदत मिळण्यास विलंब होतो. राज्यात पुरामुळे नुकसान झालेल्या रस्त्यांची तरतूद पूर्वी बजेटमध्ये असायची, अलीकडे ही तरतूद कमी झालेली आहे. हे रस्ते, पूल लवकरात लवकर दुरुस्त करावेत, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.
“शिंदे-फडणवीस सरकारचा गोविंदासाठी एक मोठा निर्णय”
राज्यात पहिल्यांदाच सोयाबीन शेतीवर गोगलगायीचे संकट उद्भवले आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. यासाठी शेतकऱ्याला बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात यावा तसेच पूर्वीचे कर्जही माफ झाले पाहिजे. यातून शेतकरी उभा राहू शकेल. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात लवकरच पालकमंत्री जाहीर करण्यात यावा, यामुळे शेतकऱ्यांना, नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी वेग येईल, अशी मागणी त्यांनी केली. शिंदे सरकारने एका दिवसात मेट्रोसाठी आणि ठाण्यातील रस्त्यांसाठी २५ हजार कोटी रुपये मंजूर केले. असेच शेतकऱ्यांसाठी देखील २५ हजार कोटी जाहीर करावेत. केवळ ठाण्यामध्ये खड्डे पडलेले नाहीत, उर्वरीत महाराष्ट्रातही खड्डे पडले आहेत. ठाणे हे मुख्यमंत्र्यांचे घर आहे पण राज्यातील इतर खड्डे कोण बुजवणार, असा खोचक प्रश्न खडसे यांनी विचारला. ज्या धडाडीने हे निर्णय घेतले तीच धडाडी शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतानाही दाखवावी, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली.
Read also
- अब्दुल सत्तार घेणार शरद पवारांकडून शेतीचे धडे; सत्तारांनी कृषीमंत्रिपदाचा कारभार स्विकारला
- “आम्ही देखील 50 थरांची हंडी फोडली”; एकनाथ शिंदेंची दहीहंडी कार्यक्रमात टोलेबाजी
- “वरळी जांबोरी मैदानावर भाजपकडून दहीहंडीचे आयोजन”; शिवसेनेची पोस्टरबाजी
- “मुख्यमंत्री साहेब तुमचं वागणं बरं नव्हे”; अन् सभागृहात अजित पवारांनी हात जोडले
- “मी मंत्र्यांशी बोलतोय, तुमच्याशी नाही”; सभागृहातच राणे अन् जाधव यांच्यात खडांजगी