मुंबई : आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते, ते प्रामुख्याने मराठा आरक्षण आणि मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेणार यावर, मात्र या विषयांना आजच्या कॅबिनेट बैठकीत बगल देऊन मंत्रिमंडळाने, सध्याची राज्यातील महामारीची स्थिती, लॉकडाऊन, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि इतर काही विषयांवर महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
राज्यात सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनची मुदत १ जूनपर्यंत असून, ती आता संपत आली आहे. या पार्श्वभूमीवर, आजच्या बैठकीत लाॅकडाऊन पूर्णपणे उठवला जाणार नसल्याची चर्चा झाल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. मात्र, महाराष्ट्रातील लाॅकडाऊन शिथिल होऊन हळूहळू आस्थापना उघडण्यास परवानगी दिली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. येत्या दोन दिवसांत यासंबंधी नियमावलीवर टास्क फोर्स सोबत मुख्यमंत्री स्वतंत्र चर्चा करतील आणि अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
तसेच, मुख्यमंत्र्यांनी कोकणाचा दौरा केला होता. यामध्ये तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी घेतली होती. आजच्या बैठकीत, गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाप्रमाणेच, तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यात येणार असून, ती वाढीव दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, अजून एक आश्चर्यकारक निर्णय आज बैठकीत घेण्यात आला असून, चंद्रपुरातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे. चंद्रपूरात गेल्या काही वर्षांपासून दारुबंदी कायम होती. मात्र, याचा उलटा परिणाम राज्यात झालेला दिसून येत असून, दारुबंदीमुळे जिल्ह्यात अवैध दारुची विक्री आणि गुन्हेगारी फोफावली आहे, याला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याचे सांगितले गेले आहे.
दुसरीकडे या बैठकीनंतर, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी थेट ‘वर्षा’ वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून, मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भातच ही भेट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या संबंधीची बैठक शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, या बैठकीत काँग्रेसकडून काय भूमिका घेतली जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
Read Also :
- ‘आघाडी सरकार जनता झोपेत असताना नाही, तर लोकांसमोर निर्णय घेते’
- लॉकडाऊन कायम, मात्र निर्बंध शिथील होणार; कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय
- “महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल,”
- ‘राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही’
- ‘आघाडी सरकारवर पवार साहेबांचा वरदहस्त; त्यामुळे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार!’