पुणे : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये कसब्यात अत्यंत चुरशीची लढाई झाली. अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर ११ हजार ४० मतांनी विजय मिळवला आहे. पण आता गेल्या 30 वर्षापासून बालेकिल्ला असणाऱ्या भाजपला निवडणूक अवघड का गेली याचे कारण शोधण्यासाठी भाजपला नक्की विचार करावा लागेल. ही निवडणूक रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजप अशी होती, कारण भाजपचे अनेक बडे नेते हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी पूर्णवेळ कसब्यात तळ ठोकून होते. गेल्या 30 वर्षापासून भाजपचा हा बालेकिल्ला. मात्र पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट हे कसब्याचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे भाजपला कधीही इतकी ताकद कसब्यामध्ये लावावी लागली नाही. मात्र या पोटनिवडणुकीमध्ये प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे गिरीश बापट हे सहभागी होऊ शकले नाही आणि याचाच फटका बसला आहे.
हेही वाचा..“चिंचवडच्या पोटनिवडणुकीत राहुल कलाटेंना भाजपनेच..” अजित पवारांचा गंभीर आरोप
1995 पासून 2019 पर्यंत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना गिरीश बापट यांनी कार्यकर्ते आणि मतदारांचे एक जाळ उभारलं होतं. जात धर्म इतकच काय तर पक्ष विरहित मतदार हे गिरीश बापट यांच्या पाठीमागे 25 वर्ष उभे होते. आता हे मतदार गिरीश बापट सक्रिय नसल्यामुळे पक्षाची साथ सोडत असल्याचं चित्र कसब्यात या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळालं. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे प्रामुख्याने दोन भाग पडतात बाजीराव रस्त्याच्या पूर्वेला आणि बाजीराव रस्त्याच्या पश्चिमेला मतदारांची विचारसरणी आणि सांस्कृतिक बदल प्रामुख्याने पाहायला मिळतो. पश्चिमेचा मतदार हा भाजपचा पारंपारिक मतदार मानला जातो तर पूर्वेचा मतदार हा काँग्रेसचा मतदार मानला जातो.
हेही वाचा..“थोडी खुशी-थोडी गम अशी माझी अवस्था झाली”, पोटनिवडणुकांच्या निकालांवर अजित पवारांची प्रतिक्रिया
मात्र गिरीश बापट यांचा संपर्क हा या मतदारसंघाच्या दोन्ही बाजूला तितकाच तगडा होता. गिरीश बापट सक्रिय नसल्यामुळे या पोटनिवडणुकीत पूर्वेचा मतदार हा भाजपची साथ पूर्णपणे सोडताना दिसतोय. तर पश्चिम भागातील मतदार देखील व्यक्ती पाहून मतदान करू असं बोलताना दिसत आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपला गिरीश बापट यांची उणीव नक्कीच जाणवली. गिरीश बापट यांच्या अनुपस्थितीचा फायदा हा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना झाला.
गिरीश बापट यांच्या अनुपस्थितीचा धंगेकरांना फायदा
1995 पासून 2019 पर्यंत कसब्यात एक हाती वर्चस्व असलेले गिरीश बापट प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे या पोटनिवडणुकीत प्रचारासाठी उतरू शकले नाहीत. पण कसब्यातील जागा हातातून दिसत असल्याने आजारी असलेले गिरीश बापट यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि कार्यकर्त्यात ऊर्जा फुंकण्याचा प्रयत्न केला. भाजपचा पारंपारिक मतदार असलेला ब्राह्मण समाज हा नेहमीच गिरीश बापट यांच्या सोबत राहिला. पण गिरीश बापट हे कसब्यामध्ये फक्त ब्राह्मण समाजाच्या जीवावर कधीच आमदार झाले नाहीत. सर्व जाती धर्मातील कार्यकर्ते गिरीश बापट यांच्या पाठीशी 1995 पासून उभा असल्याचे चित्र होतं.
हेही वाचा..“पैशांचा पाऊस थांबला अन् आज मतांचा पाऊस झाला”, विजयी उमेदवार रविंद्र धंगेकरांची प्रतिक्रिया
गिरीश बापट यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे हे फक्त पेठेतील भागातच नव्हे तर कसबा विधानसभा मतदारसंघातील पूर्व विभागात जिथे काँग्रेसचा पारंपारिक मतदार मानला जातो त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जर गिरीश बापट प्रचारात सक्रिय असते तर बापटांना मानणारा हा संपूर्ण मतदार पर्यायाने भाजपच्या आणि हेमंत रस्त्यांच्या पाठीमागे उभा राहिला असता असं राजकीय पंडितांचे म्हणणं आहे. तसं रवींद्र धंगेकर हे गिरीश बापट यांचे कट्टर राजकीय विरोधक…2009 मध्ये तर गिरीश बापट यांना रवींद्र धंगेकर यांनी निवडून येण्यासाठी अक्षरशः घाम फोडला होता. तर 2014 मध्ये देखील रवींद्र धंगेकर यांनी गिरीश बापट यांच्या विरोधात दंड थोपटले होते. त्यामुळे गिरीश बापट यांची प्रचारातील आणि एकूणच यंत्रणेत असलेली अनुपस्थिती ही रवींद्र धंगेकर यांच्या पथ्यावर पडली असंच म्हणाव लागेल.
Read also
- हेही वाचा..पुण्यातील पोटनिवडणूका राज्याच्या राजकारणाचा कल ठरवणार!
- हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणूक निकाल : भाजपाच्या अश्विनी जगताप यांच्या विजय निश्चित; तब्बल ३५ हजार मतांधिक्यानी निवडून येण्याची शक्यता
- हेही वाचा..सभागृहात शरद पवारांचा ‘एकेरी’ उल्लेख, अजित पवारांनी हात जोडले, पण विरोधकांना दिला ‘हा’ इशारा
- हेही वाचा…“नवाब मलिक देशद्रोही, मुख्यमंत्री वक्तव्यावर ठाम, सभागृहात अनिल परब कडाडले”
- हेही वाचा..“संजय राऊतांच्या मदतीला धावले शरद पवार,” हक्कभंगाच्या प्रस्तावावरून सरकारला सुनावले खडेबोल