मुंबई : किराणा दुकानांतून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचे अस्त्र उगारलं आहे. येत्या १४ फेब्रुवारीपासून राळेगणसिद्धी येथे ते उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारला दुसरे समरण पत्र पाठवून त्यांनी तारीख जाहीर केली आहे.
राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयास अण्णा हजारे यांनी आधीच विरोध केला होता. तसंच, त्या संदर्भात पत्रही लिहिलं होतं. मात्र, सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. ‘राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या भावना लक्षात घेऊन आम्ही या निर्णयावर आलो आहोत. लवकरच राज्यातील विविध सामाजिक संघटनांच्या समविचारी कार्यकर्त्यांची एक बैठक राळेगणसिद्धी येथे घेण्यात येणार आहे. त्यावेळी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. सरकारने हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी जनतेची मागणी आहे. अन्यथा मला १४ फेब्रुवारीपासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आमरण उपोषण सुरू करावे लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
राज्यातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव; संजय राऊतांचे व्यंकय्या नायडूंना पत्र
‘आमच्या संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून आमच्या साधूसंतानी, राष्ट्रीय महापुरुषांनी अतोनात प्रयत्न केला. दुकानांमध्ये वाईन आली तर ही संस्कृती धुळीला मिळेल आणि चंगळवादी, भोगवादी संस्कृती वाढीला लागेल. त्यातून काय काय अनर्थ घडतील सांगता येत नाही. ती अधोगतीकडे नेणारी संस्कृती पहायला नको म्हणून १४ फेब्रुवारी रोजी मी राळेगणसिद्धीमध्ये श्री संत यादवबाबा मंदिरात उपोषण करीत आहे, असं अण्णांनी सरकारला पाठवलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
Read also:
- सिंह कधी गिधाडाच्या धमकीला घाबरत नाही; संजय राउतांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
- अमरावतीत महापालिका आयुक्तांच्या अंगावर शाई फेकली; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण तापले
- मोठी बातमी: नितेश राणेंना मोठा दिलासा, जिल्हा सत्र न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर
- माझा राजकीय खुन करण्याचा प्रयत्न; मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
- ‘भाजपसोबत जनशक्ती असल्याचे कांदोळकरांच्या लक्षात आल्याने आता ते धनशक्तीचा वापर करत आहेत’