मुंबई : देशात महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून, आता तिसऱ्या लाटेची शक्यता असताना, देशभरात अजूनही लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. देशांतल्या अनेक भागांतील ४५ वर्षांवरील नागरिकांना अद्यापही लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही, तर तिसऱ्या टप्प्यातील १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण देखील रडतखडत सुरु असल्याचे चित्र आहे.
यातच, केंद्र सरकार आणि सिरम इस्न्टिट्यूट यांच्यात लसींच्या पुरवठ्यावरून सुरु असलेल्या राजकारणाला, आज एक नवीन वळण सिरमने दिले असून, देशात सध्या भासत असलेल्या लसींच्या तुटवड्याला अंशतः केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा दावा सिरमने केला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी म्हटलं आहे, “देशानं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) घालून दिलेल्या नियमांचं आणि सांगितलेल्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन करायला हवं आणि एखाद्या वस्तूची उपलब्धता पाहूनच, त्याच्या वापराबाबत योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे. केंद्र सरकारनं लसींच्या उपलब्ध साठ्याबाबत कुठलीच माहिती न घेता १८ वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिली.”
तसेच, “लसीकरण सध्या गरजेचं आहे. मात्र, लसीकरणानंतरही अनेकांना महामारीची लागण होत आहे. त्यामुळे लोकांनी याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे आणि महामारीपासून बचावासाठी सर्व नियमांचं पालन करायला पाहिजे,” अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली आहे.
Read Also :
- “सामना आला धावून”, आजच्या संपादकीय मधून चक्क पंतप्रधान मोदींची पाठराखण!
- ‘लसीकरणासाठी 35 हजार कोटी राखून ठेवले होते, ते गेले कुठे?’
- ‘पत्रकारांना फ्रंट लाइन वर्कर घोषित करा’, आता अमृता फडणवीसांनी केली मागणी
- महाराष्ट्रात 1 जूननंतर लॉकडाउन पुन्हा वाढणार ? मुख्यमंत्री म्हणाले…
- ‘महाराष्ट्राने कधीही कोरोनाची आकडेवारी लपवली नसल्याने…’