पुणे । विशेष प्रतिनिधी पक्षातील संभाव्य बंडखोरी रोखण्याबाबत महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय पटलवारील धुरंधर नेते शरद पवार यांचा हात कोणीही धरु शकत नाही. याची पुन्हा एकदा प्रचिती आली. शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर या ‘राजकीय महानाट्यावर’ पवारांनी ‘चाणक्यनिती’ने पडदा टाकला. लोकसभा निवडणुकांच्या वर्षभरापूर्वीच उमेदवारीची घोषणा केल्यामुळे डॉ. कोल्हे यांची नाकाबंदी झाली.
शरद पवार यांच्या खेळीमुळे डॉ. कोल्हे ‘चेकमेट’, तर विलास लांडे यांचे राजकीय ‘रि-लाँचिंग’ झाले, ही राष्ट्रवादीसाठी निश्चितपणे जमेची बाजू आहे. कारण, आगामी निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी पहिल्यांदा आहे ते संख्याबळ सुरक्षित ठेवणे हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
हेही वाचा…केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला लॉटरी, तर भाजपच्या खासदार मंत्र्यांना मिळणार डच्चू ?
काही दिवसांपूर्वी, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपाच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा सुरू झाली होती. संभाव्य बंडखोरीचा अंदाज आल्यानंतर शरद पवार यांनी आपल्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्याला अजित पवार यांनी कौटुंबिक सदस्य या नात्याने जाहीरपणे समर्थन दर्शवले. मात्र, राष्ट्रवादीतील पवारांच्या मर्जीतील पहिल्या फळीने राजीनामा मागे घेण्यासाठी जोरदार लॉबिंग केले. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी त्यावेळी केंद्रात सुप्रिया सुळे आणि राज्यात अजित पवार… अशी मागणी करीत शरद पवार यांनी तहयात राष्ट्रीय अध्यक्षपदी रहावे, अशी मागणी केली होती.
हेही वाचा…“शिंदे सरकारमध्ये ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, ते पळून जातील,” शिवसेनेचा खोचक टोला
दुसरीकडे, राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडीची ताकद कमी होणार असल्याचा धोका निर्माण झाल्यामुळे २०२४ मध्ये मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी किंबहुना अजित पवार यांनाच देण्यात येईल, अशी अप्रत्यक्ष घोषणा शिवसेना (ठाकरे) गटाकडून करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीतील कथित बंड शमले आणि राष्ट्रवादीची भविष्यातील संघटनात्मक बांधणीही कौटुंबिक सोयीची झाली.
आता हाच ‘फॉर्म्यूला’ शरद पवार यांनी शिरुर लोकसभा मतदार संघासाठी वापरला आहे. २०१९ मध्ये डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले. मात्र, अभिनेता आणि नेता यामधील कसरत करीत असताना भाजपाशी जुळवून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटातील नथूराम गोडसे यांच्या भूमिकेमुळे डॉ. कोल्हे यांच्या पुरोगामी भूमिकेला तडा गेला. त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले.
हेही वाचा…” एकनाथ खडसेंनी भाजपात पुन्हा यावे,” भाजप नेत्याची ऑफर, एकनाथ खडसे म्हणाले की, “ज्या पक्षात…”,
दरम्यान, भाजपाच्या केंद्रीय मंत्रीमंडळातील दिग्गजांशी सलोखा निर्माण झाल्यामुळे डॉ. कोल्हे २०२४ मध्ये भाजपाच्या तंबूत दाखल होणार, असा धोका निर्माण झाला होता. दरम्यान, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी वाढदिवसानिमित्त ‘भावी खासदार’ अशा आशयाचे फ्लेक्स लावून ब्रँडिंग केले. त्यामुळे चर्चा शिगेला पोहोचली. अशा परिस्थित ‘टायमिंग’ साधत पवार यांनी डॉ. कोल्हे हेच शिरुरचे उमेदवार असतील, तयारीला लागा… अशा सूचना बैठकीत दिल्या. त्यामुळे कोल्हेंचे भाजपाकडे जाण्याचे दोर कापले गेले. याउपर, उमेदवारीची घोषणा केलेली असतानाही डॉ. कोल्हे भाजपामध्ये गेले, तर सातारा लोकसभा मतदार संघाप्रमाणे सहानुभूती राष्ट्रवादीला मिळणार आहे. दिग्गज उदयनराजे यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश केला. त्या ठिकाणी विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांना फायदा झाला, हा अनुभव आहे. एखाद्या उमेदवाराची निवडणुकीच्या वर्षभरापूर्वीच उमेदवारी घोषीत करण्याची महाराष्ट्रातील ही अपवादत्मक घटना म्हणून नोंद होईल. त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी घेणे किंवा पक्षाच्या उमेदवाराचे काम करणे, हे दोनच पर्याय डॉ. कोल्हे यांच्याकडे राहिले आहेत, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
विलास लांडे यांना शरद पवारांची ताकद…
भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी शहराध्यक्षपदाच्या निवडीनंतर ‘‘माझा राजकीय वारसा अजित गव्हाणे चालवतील..’’ असे जाहीरपणे सांगितले होते. मात्र, तरीही लोकसभा निवडणुकीचे पडघम घुमू लागल्यानंतर लांडे कमालीचे सक्रिय झाले. वास्तविक, शरद पवार आणि विलास लांडे यांचे गुरू-शिष्याचे नाते आहे. अजित पवार यांच्यासोबत लांडे यांचे फारसे जमत नाही. पवार आणि लांडे यांच्यातील महत्त्वाचा दुवा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. पवार यांना त्याची फळी आणखी ‘स्ट्राँग’ करायची आहे. डॉ. कोल्हे यांना ‘चेकमेट’ कराचे असेल, तर सक्षम पर्याय उभा करण्याची आवश्यकता आहे, ही बाब पवारांनी अचूक हेरली. त्यामुळे आपला ‘हुकमी एक्का’ विलास लांडे यांचा पत्ता बाहेर काढण्यात आला. ‘‘भावी खासदार’’ अशी ब्रँडिंग करुन डॉ. कोल्हे यांना ‘चेक’ केले आणि पिंपरी-चिंचवडसह शिरूरच्या राजकारणात आपल्या मर्जीतील शिलेदाराचे पवार यांनी ‘रि-लाँचिंग’ केले. त्यामुळे ‘‘पवार साहेब, सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण…’’ आणि ‘‘ डॉ. कोल्हे खासदार आहेतच की, पण आम्हालाही पक्षाने न्याय दिला पाहिजे…’’ ही लांडे यांची वक्तव्ये राजकीय दिशा स्पष्ट करणारी ठरली आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…जागा दोन, दावेदार पाच, लोकसभेच्या ‘या’ २ मतदारसंघात “हाय व्होल्टेज ड्रामा”
हेही वाचा…शिंदेंच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ १४ जणांचं होणार समावेश, छोटेखानी होणार कार्यक्रम ?
हेही वाचा…“..तोपर्यंत मी गडावरून उतारणार नाही,” संभाजी राजेंचं शिवभक्तांना आवाहन
हेही वाचा…“बापात बाप नाही अन् लेकात लेक नाही, अशी महाविकास आघाडीची अवस्था”, प्रकाश आंबेडकरांची टिका
हेही वाचा…“नितीश कुमारांचा उद्धव ठाकरेंना फोन, ‘या’ विषयांवर चर्चा, राजकारण तापणार ?