पुणे : गेल्या ४ वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या आणि रेंगाळलेल्या, जुना मुंबई-पुणे महामार्गावरच्या कामशेत उड्डाणपूलाचे काम, आता अंतिम टप्प्यात आले असून, तो लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. मात्र, या उड्डाणपूलाचे उदघाटन करण्यास विद्यमान आमदार सुनील शेळकेंनी नकार दिला असल्याने, मावळच्या राजकारणात यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या ठिणग्या पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
याबाबत अधिक खुलासा करताना त्यांनी सांगितले, ‘कामशेत उड्डाणपुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कित्येक वर्षांपासून हे काम रखडले होते. यामुळे, ४ लोकांना आपला जीव गमवावा लागला. आत्तापर्यंत अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तसेच, या पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी, इलेक्ट्रिक ओव्हरहेड लाईनच्या टॉवरसाठी, इथल्या शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन, आपल्या लाखो रुपयांच्या जमिनी विनामोबदला दिल्या. त्यामुळे याचे श्रेय त्यांचे आहे.’
तसेच, ‘माजी आमदारांच्या विकासकामांचे श्रेय देखील मी घेणार नाही, असे सांगत, ‘पुलाचे काम ज्यांनी मंजूर करून आणले आहे. त्यांनीच या पुलाचे उदघाटन करावे,’ असेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे, या ठिकाणी पूल बांधण्यात यावा, यासाठी सर्वपक्षीय आंदोलने झाली. यांनतर २०१२ मध्ये पुलाच्या कामास मंजुरी मिळाली. मात्र, प्रत्यक्षात कामाला जानेवारी २०१७ मध्ये सुरुवात झाली. या पुलाच्या कामासाठी १७ कोटी ८८ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला.
मात्र, हे काम आता पूर्ण होत असून, दरम्यानच्या काळात, काम वेळेत पूर्ण न झाल्याने ठेकेदारावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. या सगळ्या कारणाने इथल्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असून, दरम्यानच्या काळात इथे ४ लोकांनी आपला जीव गमावला. यानंतर प्रशासनाला जागा येऊन, ठेकेदारावर व इतर दोघांवर कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, ५ सप्टेंबर २०१९ पासून पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत दर दिवसाला ४२ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
त्यामुळे, आता विद्यमान आमदारांनी नकार दिल्यावर आणि माजी आमदारांनी पुलाचे उदघाटन करावे, असे थेट सांगितल्यावर; माजी आमदार याचे उदघाटन करणार का, याची कुजबुज पूर्ण मावळात सुरु आहे.
Read Also :