मुंबई : काल पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, “आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती. उद्धव ठाकरे यांनी मोदींजींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले. मात्र, फडणवीस आणि पाटील यांच्याशी जमत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे, का? ते माहीत नाही. पण, इकडे जर वाघाशी दोस्ती असती, तर आमचे सरकार आले असते. मात्र, मोदींनी सांगितले, तर त्यांचा आदेश आमच्यासाठी आज्ञा आहे. आम्ही वाघाशी दोस्ती करू,” असे म्हटले होते.
यावर, आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, ‘चंद्रकांत दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो,’ असे प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान, या दोन नेत्यांतील हे वाक्युद्ध सुरूच असून, आता चंद्रकांत दादांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना यावर, “काल मला कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने भेट म्हणून वाघ दिला. मी म्हटलं, चांगलंय आमची वाघांशी दोस्ती आहे. तेव्हा पत्रकारांनी शिवसेनेचा मुद्दा काढला. आम्ही दोस्तीचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण, आम्ही जंगलातल्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या नाही. हा वाघ जोवर पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोवर आमची दोस्ती होती. मात्र, आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला झाला आहे”, असा पलटवार केला आहे. तसेच, २०२२ च्या महापालिकेच्या निवडणूका या खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली, स्वबळावर लढण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
संजय राऊत यांनी आज भाजपवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील टीका केली असून, ‘पंतप्रधान हे देशाचे असतात त्यांनी राजकीय प्रचार करू नये, पश्चिम बंगालमध्ये जे झाले ते चुकीचे होते. पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करता कामा नये, मग ते मनमोहन सिंग असतील किंवा नरेंद्र मोदी असतील. बाळासाहेब ठाकरेही हीच भूमिका मांडायचे. तसेच भाजपाला जे यश मिळत आहे ते मोदींच्या चेहऱ्यामुळेच मिळत आहे. मोदी हेच भाजपाचे नेते आहेत,’ असं मत व्यक्त केलं आहे.
Read Also :
- ७ वर्षांत भाजपला मिळालेल्या यशाचं श्रेय ‘मोदींच्या चेहऱ्यालाच’ – संजय राऊत
- सत्ताधारी भाजपबद्दल पुणेकरांमध्ये असंतोष; २०२२ ला राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार?
- कारखान्याच्या सर्वांगीण हितासाठी आणि सभासदांच्या काळजीपोटीच मी सहकार पॅनलमध्ये; मदनराव मोहिते यांचे प्रतिपादन
- आघाडी सरकार पाच वर्षे टिकणारच; शरद पवारांनी विरोधकावर साधला निशाणा
- “शिवसेना हा विश्वासू पक्ष”- शरद पवार