मुंबई : सर्वोच्च न्यायालयात ५ मे रोजी, मराठा आरक्षणाचा तत्कालीन राज्य सरकारने केलेला कायदा रद्द झाल्यानंतर, मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर नाराजी आणि संतापाची लाट निर्माण झाली आहे. तसेच, या निर्णयानंतर छत्रपती संभाजीराजे देखील प्रचंड आक्रमक झाले असून, त्यांनी राज्यभर दौरा सुरु केला. सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी गाठी घेऊन त्यांनी, मराठा समाजाला आरक्षणाची किती नितांत गरज आहे आणि हा मुद्दा कसा महत्वाचा आहे ही बाब या नेत्यांच्या कानावर घातली.
आज त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा आणि महत्वाचा दिवस असून, आज त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यांनतर त्यांनी थेट आता ‘वर्षा’ गाठले असून, तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासमवेत मराठा आरक्षणावरून महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी, बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग कसा काढता येईल, याविषयीच्या कायदेशीर बाबींविषयीची चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्याप्रकारे भाजप आणि पंतप्रधान हाताळत आहेत, त्यावरून त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे काही दिवसांपासून ते भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. दुसरीकडे, भाजपकडून देखील त्यांच्यावर टीका करण्यात आली असून, त्यामुळे ते आज संध्याकाळी ५ वाजताच्या बैठकीत पक्षाला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
यातच आता समाज माध्यमांवरून छत्रपती संभाजीराजेंनी मराठा समाजाचे नेतृत्व करण्यासाठी, तसेच समाजाला योग्य न्याय, हक्क आणि दिशा देण्यासाठी नवीन पक्ष काढावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे, आज संध्याकाळी मुंबईत होणाऱ्या त्यांच्या पत्रकार परिषदेत ते नक्की कोणती भूमिका जाहीर करतात आणि या आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन आणखी कोणते निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे आणि मराठा समाजचे लक्ष लागून आहे.
Read Also :
- इयत्ता १० वीचा फॉर्म्युला ठरला.! नववी-दहावीच्या अभ्यासक्रमावरुन विद्यार्थ्यांचे मूल्यांकन
- ठाकरे सरकार राज्यातला लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवणार!
- पंतप्रधानांमध्ये अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे की नाही?
- चंद्रकांत पाटलांना स्वप्नं बघण्याचा छंद, त्यावर काय बोलणार?
- आज मांडणार संभाजीराजे निर्णायक भूमिका; काय असणार राजेंची रणनीती