मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोठी टीका केली आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मांनंतर वाढीस लागला,” असे मोठे विधान त्यांनी केले आहे. तसेच, “लोकसंख्या वाढीसाठी राजकारणीच जबाबदार आहेत. जोपर्यंत देशाच्या लोकसंख्येवर कोणतेही राजकीय पक्ष एकमताने विचार करत नाहीत, तोपर्यंत हे प्रश्न कधीच सुटणार नाहीत,” असं स्पष्टही त्यांनी व्यक्त केलं आहे.
“महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर वाढीस लागला,” राज ठाकरेंचे मोठे विधान
दरम्यान, त्यांच्या या विधानाला राष्ट्रवादी कॉग्रेसने प्रत्युत्तर दिलं असून, राष्ट्रवादीचे नेते आणि मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी, ”देशातल्या वर्णव्यवस्थेला हजारो वर्षांची परंपरा आहे. राज ठाकरे यांनी त्यांचं वाचन वाढवायला हवं,” असा टोला लगावत, “राष्ट्रवादी शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. मात्र, राज ठाकरेंना हे माहीत नसावे किंवा त्यांचा जातीव्यवस्थेचा अभ्यास नसावा, म्हणून अशाप्रकारचे वक्तव्य त्यांनी केले,” असा हल्लाबोल त्यांनी केला.
राज्यात महाविकास आघाडीचा हातात-हात; जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना वाद विकोपाला
तसेच, देशात ‘मनुवादी’ वर्णव्यवस्थेने जातीव्यवस्था उभ्या केल्या. त्यामुळे जातीच्या आधारावर अनेक वर्षे देशातल्या लोकांवर अन्याय होत राहिला. छत्रपती शाहू महाराज, म.फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवांनी ही जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. राज ठाकरेंना हेही माहीत नसावे. त्यामुळे, त्यांनी केलेले वक्तव्य हे अज्ञानातून केले असावे,” असा निशाणा त्यांनी राज यांच्यावर साधला आहे.