पुणे : औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना भाजप, काँग्रेसचेही अनेक नेते उपस्थित होते. यावेळी, मुख्यमंत्री मंचावर भाषण करण्यासाठी आले असता त्यांनी, भाजपच्या नेत्यांकडे पाहून, “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी” असं म्हटल. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात शिवसेना-भाजप युतीसंदर्भात विविध चर्चा रंगत आहेत.
‘आजी-माजी आणि एकत्र आलो तर…’, मुख्यमंत्र्यांनी दिले युतीचे संकेत?
दरम्यान, यावर आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत यावर बोलताना, ‘मुख्यमंत्र्यांना नेमकं काय म्हणायचं आहे? आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय? हे मला माहिती नाही. ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावं हे मी कसं ठरवणार? त्यांच्या मनात काय हे मी कस सांगू? माझ्याशी बोलताना तर सरकारचे निर्णय, राज्य कसं चालवायचं, जनतेच्या समस्या काय, यावरच चर्चा होतात,’ अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
‘मुख्यमंत्री भर सभेत माझ्या कानात म्हणाले…’, दानवेंचा गौप्यस्फोट
दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘आजच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे, आता त्यांच्या लक्षात आलं असेल, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत. अनैसर्गिक गटबंधनामुळे राज्याचं नुकसान होतं आहे, हे त्यांच्या लक्षात आलं असेल. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली’, असं ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांनी दिली सूचक प्रतिक्रिया
तसेच, ‘राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. पण, आजची परिस्थिती तशी नाहीये. आम्ही सध्या सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाही. जनतेच्या अपेक्षा घेऊन आम्ही सरकार विरोधात आंदोलन करत आहोत. भाजप या सरकारला उत्तरदायित्व शिकवत आहे. त्यामुळे, त्या वक्तव्याचा इतकाच अर्थ निघतो की, त्यांच्या लक्षात आलं आहे. सगळीकडे भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे, आपण त्यांच्या शुभेच्छा समजूया”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
Read Also :
- संजय राऊत-चंद्रकांत पाटील यांच्यात रंगले ‘विनोदी’ शाब्दिक युद्ध
- ‘मोदींच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही!’
- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यासाठी विविध मोठ्या घोषणा
- गणेश विसर्जनाच्या दिवशी पुण्यात काय चालू, काय बंद?
- ब्रेकिंग! वाझेचा खुलासा, पवारांना राजी करण्यासाठी देशमुखांनी मागितले २ कोटी