कोल्हापूर : मराठा समाजासाठी संवेदनशील असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर, लोकप्रतिनिधींना बोलतं करण्यासाठी आणि हा तिढा सोडवण्यासाठी, तसेच समाजाला त्यांचे हक्क न्याय्य आणि लोकशाही पद्धतीने मिळवून देण्यासाठी, आज संभाजीराजेंच्या नेतृत्वात मराठा समाजाने, मूक मोर्चा काढून मराठा आंदोलनालाची सुरुवात केली. मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा आज कोल्हापुरात निघला. “आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय” अशी टॅगलाईन पुढे करून, आज शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून, शाहू महाराजांच्या आशीर्वादाने या मूक मोर्चाला सुरुवात झाली. या वेळी पावसाने देखील हजेरी लावली. मात्र याचा आंदोलनकर्त्यांवर परिणाम झाला नाही.
या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, कोल्हापुरात आज जोरदार पाऊसला सुरुवात झाली आहे. कोसळत आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवसेना खासदार संजय मंडलिक मराठा आंदोलनस्थळी दाखल, छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी दिग्गज नेते उपस्थित होते.
यावेळी अनेक लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणावरून आपली मते मांडली…
प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनस्थळी येऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. ‘मी आधीही सांगितले आहे, आणि आताही सांगतोय आमचा मराठा आंदोलनाला पाठिंबा असणार आहे. सेच सरकार कमी पडलं म्हणून ही परिस्थिती उद्भवली. मराठा समाजाला योग्य मार्गाने आरक्षण मिळेल, ‘तो’ मार्ग सरकारने निवडावा, तसेच आरक्षणाबाबत जुन्या-नवीन सरकारने ज्या दक्षता घ्यायला हवी होती ती घेतली गेलेली नाही,’ असंही ते म्हणाले.
‘संभाजीराजेंच्या मागण्यांबद्दल महाविकास आघाडी सरकार १००% सकारात्मक असून, सरकार समाजासाठी एक पाऊल पुढे येऊन पुन्हा एकदा भेटून चर्चा करण्यासाठी तयार आहे. त्यासाठी सरकार संभाजीराजेंना उद्याच वेळ द्यायलाही तयार आहे. त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन, मिळून यातून मार्ग काढावा,’ असं काँग्रेसचे नेते आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मांडलं. तसेच, ‘हातात हात घालून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. मराठा समाजाची जबाबदारी घेण्यात सरकार कुठेही कमी आणि मागे पडणार नाही’, असं आश्वासनही यावेळी त्यांनी दिलं.
शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हाताला सलाईन लावून आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खास अधिवशेषन बोलावण्यात यावं. तसेच, राज्यतल्या ४८ खासदारांनी लोकसभा सभापतींकडे आणि राष्ट्रपतींकडे पत्र लिहून ही मागणी करावी. आरक्षणाचा प्रश्न कोणामुळे अडकला आहे? कुणाचाही जर आरक्षणाला विरोध नाहीये, तर हा पेच सुटत का नाही? असा प्रश्न मराठा समाजाला पडला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन,’ असं सांगत आंदोलकांचे मनोधैर्य उंचावले.
यावेळी संभाजीराजेंचे वडील छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांनी देखील, ‘आरक्षणाबाबत पंतप्रधानांची भूमिका अजूनही समोर आलेली नाही. त्यामुळे, मराठा आरक्षणासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा. मराठा आरक्षणावर आता मोदींनी भूमिका स्पष्ट करावी, या आंदोलनामुळे दिल्लीलाही जाग येईल. मात्र, यासाठी एकटा संभाजी पुरा नसून सर्व ४८ खासदारांनी एकत्र येऊन मराठ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवायला हवा. मुंबई तुमच्या बाजूने आहेच पण आता दिल्लीही सोबत आली पाहिजे. हे आरक्षण मिळावं म्हणून, आतापर्यंत ५८ मोर्चे शांततेत काढले गेले. त्यामुळे, आरक्षणासाठी घटना दुरूस्ती व्हावी. तसेच, याबाबत राज्याने देखील आता पुनर्विचार याचिका दाखल करावी,’ असं परखड मत मांडलं.
भाजपकडून चंद्रकांत पाटलांनी, ‘नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलो आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्यांना माझा आणि भाजपचा पाठिंबा असेल. तसेच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा समाजाला सगळ्या सवलती देण्याची मागणी करणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत आणि आधीच्या सरकारने दिलेल्या सर्व सवलती पुन्हा मिळेपर्यंत होणाऱ्या सर्व आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे,’ असं सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील, पक्षाची आणि आपली भूमिका यावेळी मांडली. ‘सर्वात पहिल्यांदा मराठा आरक्षण पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली आलेल्या आघाडी सरकारने दिलं. त्यावेळी नारायण राणे समिती नेमून मराठा आरक्षण देण्यात आलं. पण तीच आमच्याकडून मोठी चूक झाली, तत्कालीन भाजप सरकारकडूनही तीच चूक झाली. कुठलाही आयोग न नेमता समिती नेमून आरक्षण दिलं. या चुकीमुळेच सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण नाकारलं,’ अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
तसेच, आघाडी सरकार मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी १००% सकारात्मक आहे. मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय शासनाला स्वस्थ बसू देणार नाही, याची ग्वाही मी तुम्हाला देतो. फक्त या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला थोडा वेळ द्या. मी आरक्षणाच्या मुद्द्यावर कालच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी, आम्ही चर्चेसाठी कधीही तयार असल्याचं म्हटलं आहे. आत्तापर्यंत मराठा समाजाने संयम दाखवला आहे. अजून थोडा संयम दाखवा. आम्ही मागण्या पूर्ण केल्याशिवाय सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, मग त्यासाठी वाटेल ती किंमत का मोजावी लागेना!, असं सांगून त्यांनी मराठा समाज आणि आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिलं आहे.
दरम्यान आता खासदार संभाजीराजे छत्रपती परवा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. कोल्हापुरातील मूक आंदोलनाची सांगता झाल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी समन्वयकांची बैठक झाली. या बैठकीत संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची माहिती दिली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणावर या भेटीमधून तोडगा निघणार का ? व संभाजीराजे यांनी घेतलेला आंदोलनाचा पवित्रा मुख्यमंत्र्यांच्या भेटींनंतर मवाळ होणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- दूध दर व शेतकरी प्रश्नांसाठी किसान सभेचे उद्या १७ जून रोजी राज्यभर होणार आंदोलन
- शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने भिडले; सेना भवनासमोर तुफान राडा
- …येत्या तीन वर्षातच नाना पटोले, अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी
- केंद्रीय मंत्रिमंडळात होणार फेरबदल; तब्बल २३ जणांच्या समावेशाची शक्यता!
- मराठा आरक्षण : संभाजीराजेंची कोपर्डीकडे पुन्हा नव्याने वाटचाल